बुधवार, १ जून, २०१६

बापूजी once more...!

कालची संध्याकाळ थोडी वादळीच ठरली. 'वादळी' या शब्दाचं प्रायोजन केवळ सरकारच्या हिवाळी/पावसाळी अधिवेशनावरुन प्रेरणा घेऊन केलेला आहे.

...तर समाजात वावरताना अहिंसेचा मार्ग स्विकारावा की नाही या विषयावरुन मी आणि माझ्या पत्नीमध्ये शीतयुद्ध पेटले. माझ्या स्वभावधर्मानुसार 'जशास तसे' या फंड्याचे मी समर्थन करीत होतो तर माझी पत्नी अहिंसेनेच जग जिंकता येते हे मला पटविण्याचा आटापिटा करत होती. पण एक दोन वाक्यातच ऐकून घेणारा तो मी नाहीच..!!! आमच्यात शाब्दीक चकमकी सुरु असताना अचानक दारावरची बेल 'trrrrriiiiiing......' अशी वाजली. आमच्यात आता तुंबळ शाब्दीक युद्ध सुरु असल्याने आमचे दोघांचेही बेलच्या आवाजाकडे लक्षच नव्हते...मात्र पुन्हा बेल वाजल्यावर आम्ही भानावर आलो...नशीब आमच्या वादविवादात तरी आम्ही अहिंसेचा मार्ग अवलंबला होता...!!!

मध्येच कोण कडमडलं म्हणून खडसावायला मी दाराची कडी उघडली आणि माझी बोबडीच वळली...!!! माझी पत्नी माझ्या मागे उभी होती..ती सुद्धा अवाक् झाली...

बाहेर दरवाज्यात चक्क 'बापूजी' उभे होते. पंचा, हातात काठी असा पेहराव पाहून अहिंसेचाच मार्ग खरा की काय असा चटकन मनात विचार येऊन गेला.

"आत नाही बोलावणार का??"

बापूजींच्या आवाजाने मी आणि माझी पत्नी अगदीच गडबडून गेलो.

"या....या  ना बापूजी...." आम्ही दोघेही एकसूरात म्हणालो.

बापूजी आत आले. लाकडी खुर्चीवरच बसले.
माझे मन लगेच इतिहासात गेले. एकेकाळी बापूजींनी मीठाचा सत्याग्रह केला होता ते आठवले...

"मीठ हल्ली खुपच महाग झाले आहे नाही??", बापूजी समोर असताना काय बोलावे हे कळत नसल्यानेच बहुतेक ती बरळली असावी.

पण मी लगेचच तिला इशारा करुन शांत बसण्याची सूचना केली.

मी विदेशी कंपनीचा शर्ट आणि जीन्स घातली होती. ते क्षणात काढून टाकून पटकन आपणही पंचा नेसावा असा मोह मलाही झाला होता पण पत्नीने डोळे वटारल्याने तो मोह मी आवरता घेतला...

"कसे काय येणे केलेत बापूजी??"- मी अस्सल फॉर्मॅलिटीचा प्रश्न विचारला..

"बरं झालं विचारलंत...मी इकडून जात होतो. हिंसा कि अहिंसा या विषयावर तुमची वादावादी कानावर पडली म्हणून आलो...!!"

"नाही नाही बापू अहिंसेचाच मार्ग खरा"..अशी सपशेल माघार घेत मी बापूंच्या पायावर डोके ठेवले तर ते पाहून माझ्या पत्नीला विजयी झाल्याचा भास होत होता...!!!

"हे बघ माझे डोके फिरवू नकोस...मी तसे म्हणालो का आता काही??"- बापूजींनी आधुनिक भाषा वापरुन मला चपराक दिली.

"पण बापूजीआजकाल अहिंसा चालते काय हो?"-मी

"का नाही चालणार? चालतेच....कारण हिंसा करणे हे हिंस्त्र प्राण्यांचे लक्षण आहे. आणि आपण मनुष्यप्राणी जरी असलो तरी हिंस्त्र मात्र नक्कीच नाही आहोत...!!!"

मला बापूजींचे म्हणणे पटले. आमच्याकडे अचानक बापूजी अवतरल्यामुळे त्यांचे आदरातिथ्य कसे करावे हे माझ्या पत्नीला कळत नव्हते...चहा सोबत बिस्कीटे दिली तर बापूजी विदेशी कंपनीची आहेत म्हणून जाम बडबड करतील म्हणून तिने चक्क देशी कांदेपोहे केले. पण...

'कांदा विदेशातून आयात केलेला तर नाही ना ' असा मी ऊगाचच टोमणा हाणला...



कांदेपोहे चविष्ट झाले होते. बापूजींनी ते खाऊन तारीफ केली. बापूजी आमच्या घरापासून जवळजवळ १०० मीटर अंतरावर एका कुडामेढीच्या घरात राहत होते. त्यांच्यावर महात्मा गांधीजींचा खुपच प्रभाव असल्याने त्यांचे राहणे, वागणे आणि पेहराव जवळजवळ गांधीजींसारखाच होता म्हणूनच आसपास सर्वजण त्यांना 'बापूजी' म्हणत. ते सहसा कुणाच्या घरी जात नसत. परंतु आमच्या घरी मात्र आज आले होते.

कांदेपोहे खाल्ल्यावर बापूजी जायला निघाले. परंतु एक प्रश्न मात्र मला सारखाच सतावत होता. शेवटी तो मी विचारलाच...

"बापूजी, या कलियुगात जो अहिंसेने वागतो त्याला जास्तच त्रास दिला जातो, त्याचा जास्तच गैरफायदा घेतला जातो...तेव्हा काय करायचे?"

"अहिंसेचा वापर तोपर्यंतच करायचा जोपर्यंत त्याचा फायदा होतोय..."-बापूजी म्हणाले.

"आणि तोटा होऊ लागला तर काय???"- मी ऊत्सुकता शिगेला ताणूनच विचारले.

बापूजींनी निर्वीकार चेहऱ्याने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले....त्यांच्या हातातली लाकडी काठी माझ्या हातात दिली आणि ते काठी शिवायच घराबाहेर निघून गेले....!!!

मी आणि माझी पत्नी अवाक् होऊन एकमेकांकडे पाहू लागलो.
जणू काही आमच्या प्रश्नाचे सध्याच्या युगाला चपखल बसेल असे उत्तर बापूंनी दिले होते....
आमचा वादविवाद तिथे संपलाच होता....!!!

 लेखन-प्रविणसर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: