बुधवार, १ जून, २०१६

तो समाधानाचा क्षण

साधारण १९९३ चा काळ. अमेयच्या बाबांची सरकारी नोकरी म्हणजे जणू विंचवाचं बि-हाड पाठीवर..दर चार वर्षांनी बदली व्हायची..दर चार वर्षांनी नविन ठिकाणी राहायला जावे लागायचे.

त्याच्या बाबांच्या ही गोष्ट लक्षात आली..मग त्यांनी त्यांच्या गावी कोकणात घर बांधण्याची तयारी सुरु केली...आणि मग मात्र सगळं कुटुंब गावी हक्काच्या घरी राहायला आलं...

परंतू त्यावेळी अमेयचे कुटुंब आर्थिक ओढाताणीचा सामना करत होते...घर बांधण्यात पैसे खर्च झाले होते..अमेयचा मोठा भाऊ कॉलेजला, अमेयही ११ वीला आणि छोटे दोघे हायस्कूलमध्ये शिकत होते.

कुटुंबाला हक्काच्या घराच्या रुपाने स्थिरता देऊन अमेयच्या बाबांनी नोकरीच्या ठिकाणी अपडाऊन करायचं ठरवलं...

घरभरणीपर्यंत ( गृहप्रवेश दिवस) काढलेली बाबांची रजा संपली होती.कामाला जायचा दिवस उजाडला. बाबा सकाळी लवकर ऊठून काय करतायत ते पाहायला म्हणून अमेय बाहेर गेला आणि आश्चर्यचकीत झाला...

आठ वर्षे जूनी सायकल..जी त्याचा मोठा भाऊ पाचवीला असताना चालवायचा...ती बाबा चक्क धुऊन स्वच्छ करत होते...

काय भानगड आहे अमेयला काहीच कळेना...

बाबांनी आंघोळ केली, भाकरी खाल्ली आणि कपडे घातले. काळी पर्स सायकलला अडकवली आणि आईला सांगून निघाले सायकलवर...


अमेयने आईला विचारल्यावर तिने सांगीतलं की ते कामाला गेलेत...!!!

अमेय ताडकन उडालाच...

३५ किलोमीटर जायचे आणि ३५ किलोमीटर यायचे तेही सायकलवर..!!!

कुटुंब चालवण्याचा हा फंडा अमेयच्या लक्षात आला.....
म्हणजेच महीन्याचे तिकीटाचे पैसे वाचले तर त्यात थोडेफार घर चालेल हा विचार होता त्यामागे..!!!

संध्याकाळी सायकलवरुन बाबा येताना दिसले की धावत जाऊन मडक्यातून पाणी आणून द्यायला अमेय उभा राहायचा...

अमेय ११ वीला कॉलेजला जात असल्याने गाडीचा पास आणि महीन्याला २० रुपये द्यायचे बाबा खर्चाला...

त्याला कॉलेजचे जीवन मौजमस्तीत नाही घालवता आले...
अमेयला २० रुपयांचे मोल जणू कळल होतेे...बाबानी सायकलवर जाऊन जे पैसे वाचवले त्यातलेच हे २० रुपये आहेत हे त्याच्या लक्षात आले.

मग मात्र अमेयने मौजमजा करायचे सोडून आभ्यासात लक्ष घातले. त्याचे वागणे राहणे उगाचच भरकटण्यापासून अलिप्त झाले.

त्याच्याकडील २० रुपयांची घडी खिशात तशीच राहत होती दिवसाच्या शेवटापर्यंत...!!!

त्या दिवशी अमेय नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला. कॉलेज सुटल्यावर एस.टी. ची तासनतास वाट पाहत राहावे लागायचे...रोजची गाडी आज मात्र लेट झाली होती. भूकेचा जोर वाढला होता...दोन तासांनंतर एस.टी. लागली..

एस.टी.त बसायला जाणार एवढ्यात अमेयला टायरजवळ एक पैशांचे पाकीट दिसले. उत्सुकते पोटी त्याने ते उचलले..आत मध्ये पाचशे रुपयांची नोट होती...

आता मात्र अमेयच्या डोक्यात विचारांचा भडीमार सुरु झाला...गरज आणि संस्कार यांची लढाई सुरु झाली..ते पाकीट घेऊन तो एस.टी.त जाऊन सीटवर बसला. पाचशे रुपये हातात होते त्याच्या...आणि कुणाला कानोकान खबरही नव्हती...

पण का कुणास ठाऊक...पाचशे रुपये मिळूनही खुश होण्याऐवजी तो नाराज झाला.
त्याला काही कळेनासे झाले होते. कंडक्टर गाडीत चढला...अमेय अस्वस्थ झाला होता.
पैशासाठी लोक ऊनातान्हात काय काय कष्ट घेतात हे त्याला आठवले...

आणि आठवले त्याचे बाबा...आणि त्यांची ती आठ वर्षे जूनी सायकल...!!!

कंडक्टरने बेल वाजवली आणि ड्रायव्हरने स्टार्टर दिला...तेवढ्यात अमेय सीटवरुन ताडकन ऊठला...

"थांबा, मला उतरायचे आहे"- अमेय नकळत बोलून गेला...

खाली उतरुन ते पाकीट त्याने कंट्रोलरकडे जमा केले...

दोन तास वाट पाहूनही मिळालेली गाडी आणि ५०० रुपये त्याने सोडले..

पण त्याच्या अस्वस्थ झालेल्या मनाला जे समाधान मिळाले त्याचे मोलच करता येऊ शकणार नव्हते...!!!

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
 लेखन-प्रविणसर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: