बुधवार, १ जून, २०१६

अशी ही माणुसकी

रविवारी ऑफीसला सुटी असल्याने श्रीधर पनवेलच्या फ्लॅटवर आला होता. कामाच्या धावपळीतून आज तो जरा रिलॅक्स होता..

रोज सकाळी न चुकता योगा, योग्य वेळी जेवण आणि कुटुंबासह रविवारी मनोरंजन...हा त्याचा दिनक्रम.

त्याला नाटक पाहायचे प्रचंड वेड होते. त्या दिवशी ५ वा.च्या नाटकाला तो कुटुंबासह वाशीच्या नाट्यगृहाला निघाला.

शहरात कार ड्राईव्हींगचा त्याला फार अनुभव नव्हता..पण कधीतरी डेअरींग करायलाच हवं या निश्चयाने तो पनवेलहून निघाला.

मुलं खुश होती...गाणी म्हणत होती...त्याचे लक्ष फक्त रस्त्याकडे आणि त्याच्या पत्नीचं त्याच्या ड्राईव्हींगकडे....


अचानक एका चौकात सिग्नल लागला आणि त्याने ब्रेकवर पाय दिला...शहरात इंचाइचाच्या फरकाने ड्रायव्हींग केली जाते हे नॉलेज त्याला तेव्हाच मिळाले..त्याच्या मनात आपला ड्रायव्हींग बाबतीत आत्मविश्वास कमी झालाय की काय अशी हळूच पाल चुकचुकली...

कारच्या काचा लावलेल्या होत्या...तो सिग्नल सुटण्याची वाट पाहत होता..इतक्यात एक भिकारी काचेजवळ आला..पैसे मागू लागला..
गयावया करु लागला...कपडे मळकट, फाटलेले होते...पण काही व्यंग नव्हते दिसत...

श्रीधर मनाशीच म्हणाला की हा तर धडधाकट आहे...याला कशाला भिक देऊ...यांना काम करता येत नाही का??

तो भिकारी खुणेने उपाशी असल्याचे सांगून गयावया करत होता. श्रीधर मात्र सिग्नल सुटण्याची वाट पाहत होता.

सिग्नल सुटला. श्रीधर त्या भिका-याला भिक न देताच निघाला...पण त्याचा चेहरा मात्र पडला होता. थोड्याच वेळात तो नाट्यगृहात पोहोचला. अडीच तास छान गेले.
पावणेआठच्या दरम्यान पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाला. नाटक पाहील्याने मूड फ्रेश झाला होता सर्वांचा.

रात्र झाल्याने श्रीधर मात्र ड्रायव्हींग नीट जमेल की नाही या संभ्रमात होता..आणि नेमके व्हायचे तेच झाले. मघाच्याच सिग्नलपाशी येऊन गाडी बंद पडली. भर चौकात मध्येच...आणि सिग्नलही हिरवा..!!!

गाडीमुळे मागेपुढे सर्वांच्या गाड्या अडकल्या..प्रयत्न करुनही कार काही स्टार्ट होईना..श्रीधर बावरला, घाबरला. काय करावे हे त्याला सुचेना.

कार भर रस्त्यातून साईडला घेण्यासाठी सर्वजण ओरडत होते पण मदतीला मात्र कुणीच पुढे येत नव्हतं...

त्याच क्षणी एक अकल्पित घडलं..त्याने भिक न दिलेला मघाचा भिकारी तातडीने त्याच्या गाडीजवळ आला...

"साहेब, मी धक्का मारतो..तुम्ही घ्या गाडी बाजूला..." तो म्हणाला आणि लगेचच धक्का मारु लागला. श्रीधरने गाडी साईडला घेतली.
कारमधून उतरला आणि एकटक त्याच्याकडे पाहू लागला...

...त्याचे पोट आत गेले होते. श्रीधरला खुप वाईट वाटले. जिवंत माणूसकीचे दर्शन त्याला तेथे झाले होते. माणूस म्हणून तो हरला होता...आणि भिकारी मात्र माणूसकीच्या वरदानाने जिंकला होता. करोडो रुपयांच्या गाड्या फिरवणाऱ्या माणसांत जे दिसले नाही ती माणूसकीची चमक त्याच्यात दिसत होती..

त्याने दाखवलेल्या माणूसकीला "थँक्यू " हा शब्द पुरणारा नव्हता...किंवा त्याला पैसे देऊनही त्या गोष्टीची परतफेड होणार नव्हती...

श्रीधरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
काय बोलावे शब्द सूचेनात...

त्या ठिकाणी त्याला फक्त एकच शब्द सूचला......................

"सॉरी....!!!"

माणूसकीच्या एका नव्या पैलूचे दर्शन त्याला आज घडले होते...
___________________________________
 लेखन-प्रविण निकम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: