बुधवार, १ जून, २०१६

गणपतराव आणि जादूचा दिवा

गणपतरावांचे घर म्हणजे जणू काही पूर्वीच्या काळातील (राज)वाडाच..!! घराची सर्व रचना पुरातन काळाला शोभेल अशी...

त्या दिवशी रविवार होता. गणपतरावांनी ठरवलं की आज जरा घराची साफसफाई करुन घ्यावी. त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली की ते मग कंटाळा करत नाहीत. मग ते जणू काही अभियानच राबवतायत की काय असा घरच्यांचा समज होतो. ते माळ्यावर चढले. हातात झाडू, खराटा घेतला. खुप दिवस माळ्याकडे दूर्लक्ष झाले होते. सर्व डेडस्टॉक मालमटरेल( मटेरियल) तिथे कोंबून कोंबून ठेवला होता. तो सर्व पसारा पाहून मग त्यांना भलतेच स्फुरण चढले. जणू काही तलवारच हाती घेतल्याप्रमाणे त्यांनी झाडू हाती घेतला. आणि लढाईत तलवार चालवतात तशी माळ्यावर तलवार चालवू लागले. आणि जाळी जळमटांमध्ये अडकून पडलेल्या आठ पायांच्या कोळ्यांना शत्रू समजून त्यांच्यावर तुटून पडले...

.........मध्येच चुकून "हर हर महादेव" ओरडले आणि गणपतरावांची बायको धावत आली. तेव्हा कुठे ते भानावर आले. आपण लढाई नव्हे तर साफसफाई करतोय हे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत ७/८ कोळी, ५ झुरळे धारातीर्थी पडली होती.

साफसफाई करता करता गणपतरावांचे एका वस्तूकडे लक्ष गेले आणि ते थोडे चकीतच झाले. कोपऱ्यात चक्क एक दिवा होता. थोडा चमकत होता. ते त्वरेने दिव्याकडे झुकले. दिवा हातात घेतला. आणि गणपतरावांना गोष्टीतल्या त्या 'अल्लादिन आणि जादूच्या दिव्या'ची आठवण झाली. लहानपणी गोष्टींतून त्याबाबत अगदी भरभरुन वाचले होते. 'हा दिवा सुद्धा त्याच पठडीतला तर नाही ना...' असे त्यांना वाटून गेले.

गणपतरावांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी वरचेवर दिवा हाताने घासून बघीतला. तर त्यातून राक्षस बाहेर आलाच नाही. उलट त्यांचेच हात काळे झाले. ते वैतागले. परंतु त्यात नक्कीच काहीतरी जादू असावी असा त्यांचा ठाम समज होता. पण दिवा घासला तरी राक्षस कसा बाहेर येत नाही...या विचाराने ते हैराण झाले.

हॅत्तेच्या...! त्यांचे चुकले होते. त्या दिव्यात तर सेल होते. त्यांनी लगोलग त्यांच्याकडील विजेरीतील nippo चे दोन सेल काढले आणि दिव्यात टाकले....आणि अहो आश्चर्यम्....!!!!

दिव्यातून चक्क राक्षस बाहेर पडला...हा राक्षस आपल्याला खाऊन तर टाकणार नाही ना असा विचार करतात न करतात तोच त्या राक्षसाने गणपतरावांच्या पायांवर लोळण घेतली. तो त्यांचे आभार मानू लागला.

"अरे पण झालेय काय, पाया का पडतोस?"

"काय करणार साहेब, मला जायचे होते अल्लादिनच्या दिव्यात पण मागील १२ वर्षांपासून भूलचुकीने या तुमच्या दिव्यात आलो नी अडकून पडलो. थँक्स तुम्ही मला शोधून काढल्याबद्दल.."-राक्षस गयावया करत म्हणाला.

हा राक्षस इंग्लिश कुठे शिकला हे विचारण्याचा गणपतरावांना अतोनात मोह झाला होता...पण जाऊदे म्हणून त्यांनी टाळलं...

"साहेब, मला मुक्त करा...."-राक्षस

"अरे पण कसं?"-गणपतरावांची शंका

"साहेब, दर बारा वर्षांनी मला दिव्यातून कायमस्वरुपी मुक्त होण्याची संधी असते. बारा वर्षांनंतर कुठलीही ३ कामे करुन देण्यात मी यशस्वी झालो तर कायमस्वरुपी माझी मुक्तता होईल. पण ती कामे मी सूचवू शकत नाही हेच माझे दुर्दैव...! तुम्ही माझ्याकडून कुठलीही ३ कामे करुन घेऊ शकताय..."

"पण अल्लादिनच्या गोष्टीत तर तू खुप काही करायचास...आणि माझी फक्त तीनच कामे?"- गणपतरावांनी नाराजी व्यक्त केली.

"हो साहेब, आता माझीही शक्ती संपत आलेय. माझ्या खात्यात फक्त शेवटची ३ कामे उरलीत. ती करुन दिली की मी मुक्त होईन त्यातले एखादे काम जरी मी करु शकलो नाही तर पुन्हा मी त्या दिव्यात अडकून पडेन, मग मात्र माझी सुटका पुढच्या बारा वर्षांनंतरच...!!!"

गणपतरावांनाही मग त्या राक्षसाची दया आली. चला तीन तर तीन..काही हरकत नाही...

"सांगा काय करु साहेब?"-राक्षसाला मुक्त होण्याची घाई झाली होती.

"पण सांगताना अगोदर एक दोन साडेमाडे तीन असं म्हणून मगच पुढे काम सांगायचं...!!!"-राक्षसाने नियम सांगीतला.

'च्यामारी....भलत्याच अटी आहेत याच्या ' असं मनातल्या मनात म्हणून काय मागावं हा गणपतराव विचार करु लागले.

"एक दोन साडे माडे तीन...जा मला पंचपक्वानाचं भरलेलं ताट आण..."

गणपतराव खादाड आहते हे त्याच्या लक्षात आलं...त्याने झपकन हवेत हात फिरवून पंचपक्वानांनी भरलेलं ताट त्यांच्यापुढे सादर केलं...

"साहेब, दुसरं काम सांगा..."

"एक दोन साडे माडे तीन...जा माझ्यासाठी उंचीतले कपडे आण....!!!"

त्यांच्या मागण्या किती संकुचित आहेत हे राक्षसाने ओळखलं असावं बहुतेक. त्याने हवेत हात फिरवला आणि काय आश्चर्य...भारीतले कपडे हजर...!!!

गणपतराव भलतेच खुश झाले.


"आता शेवटचे काम सांगा साहेब, म्हणजे मी मुक्त होऊ शकेन..."-आता राक्षसाच्या चेहऱ्यावरही टवटवी आली होती.

आता शेवटची मागणी मात्र संकुचित करायची नाही. आता काही तरी मोठ्ठं मागायचं असं गणपतरावांनी ठरवलं....आणि केली सुरुवात....

"एक दोन साडे माडे तीन...मला जगातला सर्वात यशस्वी पुरुष बनव....!!!"

आणि काय आश्चर्य....!!!!! दिव्यातून धूर बाहेर पडला...आणि पाहतात तर काय...राक्षस पुन्हा दिव्यात...!!!!

गणपतराव गोंधळून गेले. पाहतात तर काय...दिव्यातून राक्षस मोठमोठ्याने रडत होता.

"अरे पण झाले तरी काय नक्की...?"

"साहेब...तुम्ही पंचपक्वानांचं ताट मागीतलंत. ते मला शक्य होतं. एका मोठ्या सेव्हन स्टार हॉटेलमधून ते मी आणून दिलं...तुम्ही भारीतली कपडे मागीतलेत...ते सुद्धा एका महागड्या मॉलमधून मी आणून दिले..."

"मग?????"- गणपतरावांनी आश्चर्याने विचारले.

"अहो, पण यशस्वी असे सहजासहजी नाही होता येत...जीवनात यशस्वी व्हायला कुठलाच शॉर्टकट नाहीय या विश्वात. त्यासाठी अतोनात प्रयत्न, मेहनत, चिकाटी, हिम्मत..याच गोष्टी कराव्या लागतात. आयतेच कुणीही यशस्वी झालेले मला तरी आठवत नाही. आणि तुम्हाला यशस्वी बनवणं मला शक्य नसल्यामुळेच मी पुन्हा बारा वर्षांसाठी दिव्यात अडकून पडलो..."

गणपतरावांनी केवढी मोठी चूक केली होती ती त्यांच्या लक्षात आली. त्यांच्यामुळेच राक्षस पुन्हा दिव्यात अडकून पडला हे पाहून गणपतरावांना वाईट वाटले...

पण पुढील बारा वर्षांनी मात्र मी तुझी अवश्य सुटका करीन असे त्याला आश्वासन देऊन गणपतराव माळ्यावरुन खाली उतरले.

आणि इथून पुढे यशस्वी होण्यासाठी खुप मेहनत घ्यायची, प्रयत्नांची पराकाष्टा करायची असे गणपतरावांनी मनोमन ठरवले.....


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 लेखन-प्रविणसर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: