रात्री मस्तपैकी आरामखुर्चीवर हेलकावे खात होतो. एका हाताने रिमोटची बटणे दाबत असताना आणि दुसऱ्या हाताने मात्र चहाचा आस्वाद घेत असतानाच अचानक एका टिव्ही चॅनेलच्या हेडलाईनने लक्ष वेधून घेतले.
एके ठिकाणी म्हणे बेवारस वस्तू सापडली. आणि बाँबशोध पथकाने तपासणी केल्यानंतर त्यात चक्क बाँब सापडला..व तो निकामी करण्यात आला...
माझ्या हातातल्या पेल्यातील चहा गरगर फिरु लागली...हे काय नविनच..!!! अतिरेकी तर घुसले नसावेत आपल्या देशात? असे चित्रविचित्र विचार डोक्यात घोळू लागले.
याअगोदर अशा बऱ्याच घटना आपल्या देशात घडल्या होत्या. मध्यंतरी सारं काही शांत वाटत असताना मध्येच ही बातमी थडकली...!!
या एका बातमीने सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले. आपल्या सोबत असलेल्या वस्तूंविषयीसुद्धा शंका यावी इतकी घबराट पसरली होती. पण करणार काय...भित्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणतात ना...तसेच काही तरी...
माझा आत्मविश्वास तसा दांडगा...मला परिस्थितीची जाणीव होती परंतू भीती मात्र वाटत नव्हती. दुसऱ्या दिवशी मला मुंबईला काही कामानिमित्त जायचे होते.
"या असल्या वातावरणात कशाला जाताय...नंतर नाही का जाता येणार?"- पत्नीने सवाल टाकला.
"नाही गं, महत्त्वाचे काम आहे, जावेच लागेल..!"- मी
'एक बार अगर मैने कमिटमेंट कर दी तो फिर मै अपने आप की भी नहीं सुनता' हा माझ्या तोंडी नेहमीच असलेला सलमान खानचा डायलॉग आठवल्याने पत्नीनेही मग पुढे 'ब्र' काढला नाही.
मी जायची सर्व तयारी केली. बॅग रेडी केली. सकाळी ५ वाजता ऊठायचे असल्याने झी सिनेमाला लागलेला 'आशिकी २' बंद करुन टाकला आणि झोपी गेलो.
झोपेतही रात्रभर त्या टिव्हीतील बातमीच्याच अनुषंगाने स्वप्न पडले.. सकाळी अक्षरश: भयभीत होऊन ऊठलो. कशीबशी आंघोळ उरकली. कपडे घातले आणि बॅग घेऊन बाहेर पडलो.
झपझप पावले टाकत रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो. आज विचार साथ देत नव्हते. आशिकी २ आठवायच्या ऐवजी ती टिव्हीवरची बातमी काही पिच्छा पुरवत नव्हती. स्टेशनला गेल्यावर कळाले की ट्रेन १ तास ऊशिराने येणार आहे.
'माझ्या बाबतीत हे नेहमी अस्संच होतं.' असा विचार करुन तिथेच प्लॅटफॉर्मवर जरासा टेकलो. पण थोडासा कावराबावरा झालो होतो. आज मात्र भीती वाटतच होती. अचानक अतिरेकी आले आणि त्यांनी कसाबसारखा प्लॅटफॉर्मवर बेछूट गोळीबार केला तर??
आपण गेलोच मग बाराच्या भावात...!!!
मला घाम फुटला. घाबरुन घरी गेलो तर बायकोसमोर सलमान खानच्या डायलॉगमधील हवाच निघून जायची...!!! आणि इथे थांबलो तर....!!!
मग मी तिथेच राहून जरा alert राहण्याचे ठरवले. तिरक्या नजरेने इकडे तिकडे पाहू लागलो....आणि माझी बोबडीच वळली...!!!
मी ज्या बाकड्यावर बसलो होतो...त्याच बाकड्याखाली २ बेवारस पिशव्या दिसल्या.
"बॉम्ब...!!!बॉम्ब...!!!! वाचवा वाचवा...."
नकळत मी कधी मोठ्याने ओरडलो ते मलाच कळले नाही. लोकांची गर्दी जमली. आजूबाजूचे पोलिस धावत आले. काय झाले ते मला विचारु लागले. माझी बोबडी वळल्याने मी बोटानेच बाकड्याखाली इशारा करु लागलो...
आता मात्र घाबरुन गर्दी पांगली. ताबडतोब बाँबशोधक पथकाला पाचारण करण्यात आले.
आता मी जरा भानावर आलो होतो...पण मनातून मात्र घाबरलो होतो. हे सारे खोटे ठरले तर??
सगळीकडे माझी फुकट बदनामी व्हायची...!!!
इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली.
बाँबशोधपथकाने दोन पिशव्यांपैकी १ पिशवी मोठ्या प्रयासाने उघडली. आणि उपस्थित सर्वांनीच तोंडात बोटे घातली. जो तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. मी एखादा मोठा गुन्हेगार असल्यासारखे मला झाले. कारण त्या पिशवीत 'बाकरवड्या' होत्या.
मी आता मात्र तेथून पळण्याच्याच बेतात होतो. नाहीतर पोलिस मला सोडणार नव्हते. मला पुन्हा घाम फुटला.
मी पळण्याच्या बेतात असतानाच पथकाने दुसरी पिशवी उघडली आणि सगळ्यांनी पुन्हा एकदा तोंडात बोटे घातली. नक्कीच त्यातही 'चकल्या' वैगेरेंसारखाच एखादा पदार्थ असणार असा माझा पक्का समज झाल्याने बदनामीच्या भीतीने मी सुसाट पळत सुटलो...पण मागे वळून पाहतो तर काय..!!! जो तो बॉम्ब-बॉम्ब ओरडत सैरावैरा धावत होता. बापरे...!!! दुसऱ्या पिशवीत चक्क खरोखरचाच बॉम्ब सापडला होता...!!!
"वाचलो बुवा...!!! बॉम्बच्या कचाट्यातूनही आणि पोलिसांच्याही..." असे म्हणून धरणीला पाय लावून पळालो आणि कसेबसे घर गाठले.
दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली-
'एका अज्ञात इसमाच्या प्रसंगावधानामुळे बॉम्बच्या स्फोटातून शहर बचावले. परंतू तो अज्ञात इसम कोण आहे ते समजू शकले नाही.'
मी थोडक्यात वाचलो होतो. नाहीतर माझ्या नावाचा ऊगाचच प्रचार आणि प्रसार व्हायला वेळ लागला नसता. हकनाक अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर मी आलो असतो.
मुकाट्याने टिव्ही लावला....योगायोगाने कालचाच 'आशिकी २' लागला होता....मस्त एन्जॉय केला मग सिनेमा....!!!!
_____________________________________
लेखन-प्रविणसर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा