बुधवार, १ जून, २०१६

♡●प्रेमाची विस्कटली घडी●♡

आज नदी संथ वाहत होती. तो नकळत एकेक दगड नदीत फेकत होता. थोडा नाराज, उदास अशा अवस्थेत नदीकिनारी बसलेला अन् त्याची नजर पाण्याकडे खिळलेली...वाहतं पाणी जणू हातातून निसटून पुढे जात आहे आणि पुन्हा कधीच परत फिरुन मागे येणार नाही या भावनेने तो अस्वस्थ झाला होता. कारण त्याच्या बाबतीतही अगदी तस्संच घडलं होतं. पाण्यात फेकत असलेल्या प्रत्येक दगडाबरोबर तो आठवणींच्या फ्लॅशबॅक मध्ये जात होता...

ज्याप्रमाणे हिऱ्याची चमक कधीही लपून राहत नाही. तो दृष्टीस पडतोच. तश्शीच योगायोगाने ती भेटली होती त्याला. जणू काही लाखात एक असलेला हिरा ! तिच्यात एक सच्चा माणूस होता. तिचे एकंदर व्यक्तिमत्त्व पाहून तो भारावून गेला होता. अशी व्यक्ती या अगोदर कधीच पाहीली नव्हती त्याने. एवढी ओतप्रोत भरलेली माणूसकी ! तो भाषेतला संयमीपणा ! तो फुलांसारखा नाजूकपणा...

त्याच्या जणू मंतरलेल्या मनाने शेवटी तिला मैत्रीबद्दल विचारलेच. आणि तिनेही त्याचा मिळताजुळता आणि चांगला स्वभाव पाहून त्याच्या मैत्रीला होकार दिला.

हळूहळू त्यांच्यातली मैत्री नावारुपाला येऊ लागली. तिच्या आयुष्यातील मैत्रीत फक्त तो होता. आणि त्याच्या?

होय ! त्याच्याही मैत्रीचा जणू ती श्वास होती. तिची आठवण काढण्याचा प्रश्नच नव्हता. इतकी घट्ट मैत्री होती त्यांची..त्यांच्या मैत्रीत प्रेम होतं की प्रेमात मैत्री होती ते न कळण्याइतकं घट्ट नातं बनलं होतं त्यांचं.

बस्स...त्याने तिच्यासोबत पुढील जीवन जगायचं ठरवलं. ती त्याचा जणू प्राण होती. पण त्याचा स्वभाव थोडा वेगळा होता. खडतर परिस्थितीची त्याला जाणीव होती. संघर्षातून धडपड करण्याचा अनुभव होता. एखाद्या दिवशी खायला नसेल तर पोटभर जेवल्यासारखं हसू चेहऱ्यावर ठेवण्याचा त्याचा स्वभाव. तिच्यासमोर वावरताना आपण खरंच खुप खुश, आनंदी आहोत, आपण खुप मजेत जगतोय असा खोटा आव सतत आणायचा...
रात्री झोपताना मात्र अस्वस्थ व्हायचा. कधी कधी समोर पूर्ण अंधार असल्यासारखं वाटायचं त्याला..पुढे काही चांगलं भविष्य असेल याबाबत थोडा साशंक असायचा !

तिला हे कळाले. तिने धीर दिला. या जगात आजपर्यंत कुणी कुणाला दिला नसेल असा मदतीचा हात तिने पुढे केला. एवढं निस्वार्थ नातं संपूर्ण आयुष्यात त्याने फक्त एकदाच पाहीलं होतं ते फक्त तिच्या रुपाने.

त्याला आता आयुष्याची भीती वाटत नव्हती. तिच्यारुपी जणू एखादी शक्ती त्याच्या मागे खंबीरपणे उभी आहे हे त्याला जाणवत होतं. तेव्हाचे काही दिवस त्याच्या आयुष्यातील खुप अडचणींचे होते. एका पाठोपाठ एक संकटं येत राहीली. तो मात्र त्यातही आनंदी असल्याचा खोटा आव आणायचा. तिला सतत म्हणायचा की मी जीवनाचा खुप आस्वाद घेतो आहे... हे जीवन खुप सुंदर आहे. life is really very beautiful...!!!

पण प्रत्यक्षात तसे नव्हतेच. life is beautiful म्हणताना जीवनातल्या प्रत्येक संकटाशी लढूनच त्याला पुढे जावे लागत होते.
पण तो आता घाबरत नव्हता कारण त्याच्या साथीला खंबीरपणे उभी होती ती...!!! फक्त त्याची...

होय, ती फक्त त्याची होती. हक्काची. तिला कुणी वाईट म्हणू नये, तिच्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू नये. तिला कुणाचा त्रास होऊ नये यासाठी तो झटायचा. कारण ती फुलासारखी नाजूक होती. तिच्या चेहऱ्यावरील फुलांसारखी टवटवी कमी व्हायला नको असे त्याला सतत वाटायचे. सतत तिचा विचार. त्याच्या आयुष्याची कल्पना  तिला वगळून त्याला करताच यायची नाही इतका तो तिच्यात गुंतला होता.


आयुष्यात कधीही न पाहीलेलं प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी सारं काही तिच्यारुपी त्याला मिळालं होतं. त्याला त्याच्या आयुष्यात आजपर्यंत कधीच कुणाकडे रुसता नव्हतं आलं, हक्काने भांडता नव्हतं आलं. पण आता तो तिच्याकडे रुसायचा..भांडायचा..अगदी छोट्या छोट्या कारणांनी चिडायचा..कधी रागवायचाही...खुप मोठ्या हक्काने, आपलं हक्काचं माणूस.. म्हणून !! असा पूर्ण विश्वास त्याने तिच्यावर टाकला होता...

कधी कधी तो तिच्याशी न बोलता अबोल राहायचा. त्याला वाटायचे ती समजावेल मग तो बोलू लागेल पुन्हा. कधी कधी तो तिला लटकेच दूर लोटायचा कारण त्याला विश्वास होता ती तेवढ्याच प्रेमाने येऊन बिलगेल. असे रुसवे-फुगवे या गोष्टी सुरु होत्या. त्यातून प्रेम अधिक वाढेल असा त्याचा समज. पण सगळेच बिघडले ! तिचा गैरसमज होऊ लागला. त्याचे आपल्यावर अजिबात प्रेम नाहीय असे चित्रविचित्र विचार तिच्या मनात येऊ लागले...

खरंतर त्याच्या मागे संकटांचा ढीग होता...पण तरीही तो जगातला सर्वात सुखी माणूस असल्यासारखा वागायचा त्यामुळे तिचा आणखी गैरसमज होत गेला. तिला वाटायचं की तो तिच्या बाबतीत गंभीर नाहीय, त्याला तिची गरज नाहीय. त्याचं तिच्याकडे लक्ष नाहीय.

पण खरी परिस्थिती वेगळी होती. तो तिच्याशिवाय जगूच शकत नव्हता. पण तसे त्याने तिला आजपर्यंत कळू दिले नव्हते. त्याला वाटायचे तिने ते समजून घ्यावे. प्रत्येक श्वासाबरोबर त्याला येणारी तिची आठवण श्वास थांबल्यावरच संपणार होती...याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती.

अचानक त्याच्यावर एक मोठं अस्मानी संकट कोसळलं. आता मात्र तो पुरता हलून गेला. त्याला आनंदी, सुखी असल्याचा खोटा आव आणताच येईना. घाबरुन गेला. रडवेला झाला. या संकटातून बाहेर पडणं शक्यच वाटत नव्हतं. पण एक आशेचा किरण होता......ती  !!! तिच्याकडे सारे उपाय आहेत इतका त्याचा ठाम विश्वास.

पण ती गैरसमजाच्या टोकावर उभी होती. त्याला तिच्यातलं अंतर स्पष्ट दिसत होतं. तिने यावेळी मदतीचा हात दिला पण खुप दूर राहून.
त्याला कळेना काय झालंय, कुठे चुकलंय.
इतके दिवस त्याने तिच्यावर असलेले प्रेम सांगीतले नव्हते तिला पण आता त्याला खरे सांगितल्याशिवाय राहवेना.

तो तिला म्हणाला-"मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. नाही राहू शकत."

आज कुठलाही खोटा आव नव्हता त्याच्या बोलण्यात. तो जे म्हणाला ते हृदयाच्या कप्प्यातून आलेल्या भावना होत्या.

"विसरुन जा मला..." ती म्हणाली.

त्याचा श्वास क्षणभर अडखळला. तिने निर्णय घेतला होता एकतर्फी !

आता मनातले सारे काही सांगायलाच हवे असा त्याने निर्णय घेतला. ती म्हणजे त्याचा जणू जीव होती. तो तिच्यावर किती प्रेम आहे ते सांगू लागला. पण आता खुप उशीर झाला होता. ती निर्वीकार होती. ती त्याच्या आयुष्यातून निघून जाण्याच्या बेतात होती.

आणि ती निघूनही गेली !

त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ती त्याला सोडून गेली होती पण येणारा प्रत्येक क्षण कसा जगावा हे एक मोठे प्रश्नचिन्ह त्याच्यासाठी ठेऊन गेली होती.

प्रेम असलेल्या माणसाला विसरुन जाणं ही आजवरची जीवनातली अशक्यप्राय गोष्ट. मग त्याला तरी कशी शक्य होणार? त्याच्या प्रेमात सच्चेपणा होता म्हणूनच त्याला ते अशक्य वाटत होतं सारं.

नदीचं पाणी वेगानं धावत होतं. त्याच्याकडील दगड संपले होते...life is beautiful म्हणणारा तो अतिशय नाराज, निस्तेज अवस्थेत ऊठला आणि कुठलंही ध्येय नसलेल्या वाटेवरुन चालू लागला....

------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: