बुधवार, १ जून, २०१६

स्वर्गाची (रिटर्न) वारी !

आमच्या गावातले गोपीचंद मास्तर १० वेळा स्वर्गात जाऊन आलेत अशी गावभर चर्चा होती. पण ते स्वर्गात गेले कसे आणि कुठून हे मात्र कळायला अजिबात मार्ग नव्हता. चांगलं वागलं की माणूस स्वर्गात जातो आणि वाईट वागलं की नरकात एवढंच काय ते आम्हाला माहीत होतं. पण हे मास्तर चक्क १० वेळा स्वर्गात जाऊन आले म्हणजे कम्मालच होती. ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय होता. शेवटी ठरले या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष लावायचाच.

एके दिवशी गोपीचंद मास्तर आपल्या जावयाकडे वस्तीचे राहायला गेल्याची संधी साधून इकडे गावाने मिटींग बसवली.

"मास्तर गावात राहूनही स्वर्गात जाण्याचा आम्हाला पत्ता लागून देत नाहीत म्हणजे काय...!!! आम्हाला पण जायचंय स्वर्गात..."
-नामदेव पवार बरळला.

"आरं पण त्यासाठी मरावं लागतं. तू हायेस का मरायला तयार बोल?" धोंडोबाने फिरकी घेतली.

"आरं मास्तर पण जीतं हायेत न्हवं, मं ते कसं काय गेलं स्वर्गास्नी??"

या पांडूच्या प्रश्नावर सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. उद्या मास्तर आले की त्यांना जाब विचारायलाच हवा असा निर्णय ठरला...

"जायचं तर सगळ्यांनीच जायचं स्वर्गात, नाहीतर कुणीच नाही, मास्तरानी पण नाही..!!!"- गावच्या प्रमुखानं निर्णय दिला.

कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि आम्ही मास्तरांना विचारतोय असा विचार करुन जो तो झोपी गेला.

दुसरा दिवस उजाडला. सगळे ऊठले. मास्तर नुकतेच आले होते घरी. एकेक करता सारा गाव मास्तरांच्या घरी जमला...गावाच्या समोर मास्तरांना बसवले...

"मास्तर, आता नाय म्हणू नका...पण तुमी स्वर्गात जाऊन आलाय बऱ्याच वेळा हे आम्हास्नी ठाऊक झालंय...!!!"

मास्तरांच्या जीवात जीव आला...नाहीतर आख्खा गाव कशासाठी घरी जमलाय या विचाराने त्यांची पाचावर धारण बसली होती.

"अच्छा अच्छा ते होय...!!! मला आला कंटाळा की जातो स्वर्गात...आणि परत यावंस वाटलं की येतो परत..." मास्तरांनी पुडी सोडली...

"मास्तर माझा बा भेटला काय हो तिकडं? हीथं नुसता दारु ढोसायचा..."- सदा घोडकेने विचारलं.

"अरे बाबा, तुम्हाला माहीत आहे ना वाईट गोष्टी केल्या की माणूस नरकात जातो...मग तुझा बाप स्वर्गात कसा भेटणार....!!!"
-मास्तर.

"म्हणजे आम्हाला स्वर्गात जायचं तर कायतरी चांगलं काम करावं लागणार की काय?"- शेवंतानं डेअरिंग करुन विचारलं...

"हो तर, त्या शिवाय का जाता येणार आहे?...तुम्ही सगळ्यांनी चांगलं वागायला सुरुवात करा...एका महीन्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना जरुर स्वर्गात घेऊन जाईन..."- मास्तरांनी आश्वासन दिलं.

गावकऱ्यांनी कसं चांगलं वागायचं, कोणत्या चांगल्या गोष्टी करायच्या त्या मास्तरांकडून समजावून घेतल्या.

त्या दिवसापासून गावात, आणि गावातील माणसांच्यात अमुलाग्र बदल झाला. नेहमी खोटं बोलणारे अगदी खरं बोलू लागले. शाळेत न जाणारी ऊनाड मुले शाळेत जाऊ लागली. दारु आणि व्यसनं करणाऱ्यांनी सारी व्यसनं सोडली. प्रत्येकाची अगणं स्वच्छ झाली. रंगरंगोटी झाली. वैयक्तीक स्वच्छता वाढली. लोक एकमेकांशी प्रेमभावनेने बोलू लागले, एकमेकांना मदत करु लागले. प्रत्येकाने अतिशय सभ्यपणा स्विकारला होता. कारण स्वर्गात प्रत्येकालाच जायचे होते.

महीना संपला. १ तारखेला ठरल्याप्रमाणे गावकरी मास्तरांच्या घरी जमा झाले. मास्तरांनीही होकार दिला. आणि सुरु झाली स्वर्गाची वारी...!!!

'आपल्याला स्वर्गात बसने जायचं आहे' असं मास्तरांनी सांगताच सस्पेन्स वाढला. सगळे बसस्टॉपवर ऊभे होते.

'स्वर्गात जाणारी बस कुठली?'
'ड्रायव्हर कोण असतो'
नुसती चर्चा.

शेवटी एक रिकामी बस आलीच आणि मास्तरांनी सगळ्यांना बसमध्ये बसण्याची सूचना केली. ड्रायव्हर आपल्यासारखाच साधा माणूस बघून सारे अवाक् झाले.

आणि गाडीचा स्वर्गाच्या दिशेने प्रवास सूरु झाला. सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली होती.
 काही अंतर प्रवास केल्यावर अचानक गाडीला ब्रेक लागले...!!! उत्सुकतेने प्रत्येकजण खाली उतरला...समोर होती एक मस्त मोठी इमारत...प्रवेशद्वारावर भली मोठी पाटी- 'स्वर्ग'...!!!

प्रत्येकाने स्वर्गात प्रवेश केला. वाह..! लई भारी. रंगरंगोटी जिकडेतिकडे, गार हवा, थंड पाणी, सरबते, पंचपक्वाने...!!! गावकरी भारावून गेले. पक्वानं वाढायला सुंदर अशा अप्सराही होत्या. सर्वांनी खाण्याची मजा लुटली.

"चला आता तुम्हाला संपूर्ण स्वर्ग दाखवतो"- असे म्हणून मास्तरांनी गावकऱ्यांना आसपासच्या परिसरात नेले. अतिशय सुंदर घरे, स्वच्छता, चांगुलपणा जिकडेतिकडे पसरल्यासारखा वाटत होता...स्वर्गातील लोक अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या वर्तनाचे वाटत होते...जिकडे तिकडे झाडांनी, फुलांनी शोभा आणली होती. लोकांनी स्वर्गात आणल्याबद्दल मास्तरांचे आभार मानले...! !!

प्रत्येकजण मास्तरांच्या पायांवर डोके ठेवत होता...!!!

मास्तरांनी सर्वांची हात जोडून माफी मागीतली.
"मला माफ करा ग्रामस्थ मंडळींनो...!!!"

सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले. काय भानगड आहे ते कुणाच्याही लक्षात येईना.

"मित्रांनो, हा स्वर्ग नसून आपल्या शेजारच्या जिल्ह्यातील आदर्श गाव आहे...!!! तुम्ही 'स्वर्ग' नावाची जी पाटी वाचलीत ते इथले एक झक्कास उपहारगृह होते स्वर्ग नावाचे. मी तुमच्याशी खोटं बोललो. पण चांगलं वागल्याने इथे पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करता येतो हे तुम्हाला पटवून द्यायचे होते...म्हणून हा सारा खटाटोप...तोही आपल्या ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून मी पुढाकाराने घडवून आणला..."

लोकांना यावर काय बोलावे तेच कळत नव्हते.
त्यावर सरपंचांनी पुढे होऊन टाळ्या वाजवल्या आणि मग त्यांचे अनुकरण करत आख्खा गाव टाळ्या वाजवू लागला...!!!

"मंडळीनो, मी अशा दहा गावांना आजपर्यंत भेट दिल्यामुळेच मी दहा वेळा स्वर्गात जाऊन आलोय असे तुम्हाला सांगीतले होते."

एव्हाना सगळ्यांची ट्यूब पेटली होती....
स्वर्गाचे अमिष दाखवून मास्तरांनी आपल्याही गावाचा महीन्याभरात जणू स्वर्गच करुन टाकला आहे हे साऱ्यांच्या लक्षात आले...
आणि मग सुरु झाली...आपल्याच स्वत:च्या स्वर्गाची वारी....!!!

 ______लेखन-प्रविण निकम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: