बुधवार, १ जून, २०१६

जंगली वाघ आणि दहा माणसे

उदयपूर गाव घनदाट जंगलाला जणू टेकलेलेच होते. या जंगलात वेगवेगळे प्राणी राहत असल्याने गावातील बऱ्याच हौशानवशांना शिकारीचा छंद जडला होता. लांब पल्ल्याचा फोकस साधणाऱ्या बॅटऱ्या, शिकारीच्या विनापरवान्याच्या बंदूका आणि इतर वेगवेगळी हत्यारे घेऊन रोज रात्री या हौशी लोकांची जंगल स्वारी असायची. जंगलातले सर्वच प्राणी तर अगदी वैतागून गेले होते.

शिकारी लोक आठवड्यातून एक सुटी घ्यायचे आराम करायला. तोच आज सुटीचा दिवस होता. कसल्यातरी विषयावर गावची मंडळी एकनाथ सरपंचाच्या ओट्यावर गप्पा मारत बसली होती. गावातली छोटी मुले अंगणात सूचेल तो खेळ खेळण्यात मग्न होती.

...आणि अचानक भयानक प्रसंग घडला. गप्पा मारत बसलेल्या लोकांपुढे कुठूनतरी पाच जंगली वाघ आले. डरकाळी फोडू लागले. सर्व लोक सैरावैरा पळू लागलो. सर्वांची एकच धांदल उडाली. मुले घाबरुन गेली. काहीजणांनी दारे खिडक्या लावून त्यांच्या फटीतून काय घडतंय ते पाहू लागले. पाचही वाघांनी पळण्याच्या तयारीत असणाऱ्या काही माणसांना झपकन आपल्या जबड्यात पकडले आणि गेले जंगलाच्या दिशेला निघून ! गावातील लोक आक्रोश करु लागले. काय करावे ते त्यांना कळेना. ज्यांना नेले त्यांच्या बायका धाय मोकलून रडू लागल्या. पोरांनी टाहो फोडला. बघता बघता बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. काय करावे कुणालाच काही कळेना...आख्खा गाव शांततेत बुडाला जणू काही गावात कर्फ्यू लागला होता असेच वातावरण होते...

तो दिवस निघून गेला. सकाळ झाली. रडारड थांबली होती आता...पण सर्वजण सुन्न झाल्यासारखे वाटत होते. आणि सुरु झाला पुन्हा कालचाच खेळ...जंगलाच्या दिशेकडून कालचेच चार पाच वाघ गावाच्या दिशेने येताना दिसले. आणि पुन्हा झडप घालून चार पाच जणांना जंगलाच्या दिशेने घेऊन गेले.

आता मात्र कहर झाला. लोक बिथरले..त्यातल्या काहींनी शिकारीच्या बंदूका काढल्या, काहींनी सुरे, तलवारी, भाले, फरशा वैगेरे जे हाती लागले ते हत्यार घेतले. आणि निडरतेचा आव आणून सारी पुरुष मंडळी निघाली जंगलाच्या दिशेने...बायका आणि मुले मात्र भेदरलेल्या अवस्थेत आपापल्या घरांतच कडी लावून बसल्या होत्या.

लोक झुंडीने जंगलात शोध घेत होते. वाघांनी पळवलेल्या आपल्या दहा माणसांची निदान मृत शरीरे तरी आपल्या हाती सापडतील या आशेने...

आणि चालता चालता अचानक डरकाळीचा आवाज झाला...लोकांनी शस्त्रे सज्ज केली.


"थांबा, आपापली हत्यारे खाली फेका नाहीतर तुमच्यातला एकही जिवंत राहणार नाही !"- एक म्होरक्या वाघ म्हणाला. त्याच्या दोन्ही बाजूने इतरही विसेक वाघ होते.

"पण आमची दहा माणसे तुम्ही मारलीत. तरीही आम्ही गप्पच राहायचे काय?" एकनाथ सरपंच कसाबसा बोलला.

"काय फरक पडणार आहे तुम्हाला हजारातली दहा आम्ही मारली तर?" वाघांतला एकजण पुढे येऊन म्हणाला.

"असं कसं म्हणताय...ज्यांना तुम्ही मारलंत त्यांची बायका पोरे रडतायत..बिच्चाऱ्यांचा आधार तुटला" माणसांच्यातला कुणीतरी बोलला.

"आधार तुटला तरी जगतीलच ना...!! आम्ही नाही का जगत आमचा आधार तुटल्यावर?" एक वाघ हमरीतुमरीवर आला.

पण या वाघाचा प्रश्न नीट न कळल्याने दगडू न्हाव्याने विचारलेच, " तुमचा आधार कुणी तोडला? आमचा त्याच्याशी काय संबंध?"

सगळेच वाघ आता डरकाळी फोडू लागले. जणू काही दगडू न्हाव्याच्या उलट बोलण्याने त्यांना चिथावणी दिली होती.

"तुमचाच संबंध आहे....!!!" सर्व वाघ मोठ्याने म्हणाले.

"आम्ही आमच्या जंगलात खुप मजेत असायचो. जसे तुम्ही तुमच्या गावात असायचात अगदी तस्सेच...पण तुमची माणसे आमच्या जंगलांवर आक्रमण करु लागली. आमचे संरक्षण, संवर्धन करणे तर दूरच पण आमची जी उरलीसुरली संख्या आहे ती सुद्धा तुम्ही नामशेष करण्याच्या मागे लागलात !! आम्ही नष्ट व्हायला निसर्ग कारणीभूत नसून तुम्ही माणसेच आहात...अरे, सर्व प्राण्यांत सर्वात बुद्धीमान समजल्या जाणाऱ्या माणसांनो, आमच्यावर बंदूका झाडताना थोडासा विचार करा रे...आमचंही कुटुंब असतं, आम्हालाही छोटी पिल्ले असतात !!!"

डरकाळी फोडणारे वाघ थोडे रडवेले झाले होते. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून हत्यारबंद लोकांच्या हातातील शस्त्रेही आपोआपच गळून पडली होती...

"आम्हाला माफ करा...आमचे चुकले !!!" सर्व माणसे हात जोडून माफीची अपेक्षा करु लागली. आणि उदास भावनेने मागे फिरुन घरांच्या दिशेने चालू लागली. चालत असतानाच मागून कुणीतरी हाका मारण्याचा आवाज ऐकू आला. सर्वांनी वळून पाहीले आणि काय आश्चर्य !!! त्या वाघांच्या बाजूला त्यांनी पळवून नेलेली तीच दहा माणसे अगदी सुखरुप उभी होती...रडवेले चेहरे केलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण हास्य पसरले.

सर्वजण एकमेकांना आनंदाने मिठी मारु लागले.

"आमची संख्या हळूहळू कमी होत चाललेय. आमची शिकार तुम्ही करता म्हणून आम्हीही तेच करणे योग्य नाही. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये ! आम्ही फक्त तुम्हाला धडा शिकवण्यासाठी हा माणसे पळविण्याचा प्लॅन केला होता !!"

माणसांच्या नाहीत पण वाघांच्या म्हणी पाठ आहेत आणि ते आचरणातही आणतात हे पाहून माणसे हरखून गेली. त्यांना स्वत:ची लाज वाटली. कमीपणाची भावना निर्माण झाली. त्या सर्वांनी वाघांना यापुढे शिकार न करण्याचे मनोमन वचन दिले...आणि एक विलक्षण प्रेरणा घेऊन सगळेजण आपल्या गावची वाट चालू लागले...

___________________________________लेखन- प्रविणसर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: