कालचीच गोष्ट. वृक्षारोपण करायचे म्हणून दहा झाडे आणली नर्सरीतून. त्यात आंब्याची, चिंचेची, आणि नारळाची झाडे होती. आदल्या दिवशीच गावातल्या एका माणसाला हाताशी घेऊन खड्डे खणून ठेवले होते.
कालची सकाळही अगदी धावपळीचीच. झोपेतून ऊठलो तोच स्वप्नातून खडबडून जागा होत.
त्याचं झालं असं...रात्री घरात मी एकटाच होतो. घरातले सगळे मामाकडे पाहूणे गेले होते. टिव्हीसमोर रिमोटने एकेक चॅनेल उगाचच पुढे पुढे सरकवत होतो.
...आणि माझ्या हॉलचा दरवाजा धाडधाड वाजू लागला. मी एकटाच असल्याने पुरता घाबरुन गेलो. 'कोण असेल?' याची कल्पनाही करवत नव्हती. कारण आमच्या खेडेगावात आजवर मी खुप विचित्र कथा ऐकल्या होत्या. तरीही घाबरत घाबरत मी दरवाज्यापाशी गेलो.
"कोण?" मी घाबऱ्या आवाजातच विचारले.
"आधी दार उघड मग सांगतो !"
आता तर मी पुरताच घाबरुन गेलो होतो...
मी भूतबीत मानत नाही. पण रात्री बाराच्या दरम्यान असा आवाज ऐकल्याने मी माझी सद्-विवेकबुद्धी जणू हरवून बसलो होतो.
कोंढाणा किल्ला लढवताना जसा मावळ्यांच्या 'लढा नाहीतर मरा' असा आवाज कानी पडला तस्साच आवाज माझ्याही कानात दुमदुमल्यासारखे झाले.
मी डेअरिंग करुन पुढे झालो आणि दरवाजाला हात घातला. सटकन कडी उघडली आणि तो झपकन आत आला.
उलटे पाय...दोन दात बाहेर...अगदी विचित्रच !
हा भूतांच्याच जातीतला आहे हे मी पुरते ओळखले होते.
"बाबारे काय पायजे तुला, तू इथे कशाला आलास?" मी डेअरिंग केली.
"खामोश !" त्याने आवाज टाकला....
मी अजूनच घाबरलो. पण हा काय अमरिशपूरीचा पिक्चर बिक्चर बघतो की काय अशी पुसटशी शंकाही आली.
"मी तुझ्याकडे काही मागायला आलोय..." त्याच्या पुढच्या दोन दातांच्या फटींतून शब्द बाहेर पडले.
"ए बाबा, पैसेबियसे नाहीत हं माझ्याकडे..."
"शट अप !! मला पैसे नको आहेत..."
हा भूत असला तरी सुशिक्षीत वाटत होता. तो चक्क इंग्रजी झाडत होता माझ्या अंगावर...
आता मलासुद्धा इंग्रजी झाडण्याचा मोह झाला आणि मी तशी सुरुवात करणार तोच त्याने माझ्यापुढे लोटांगण घातले आणि 'प्लीज इंग्रजीत नको' अशी मला विनंती करु लागला.
"अरे पण मग तुला हवे तरी काय?" मी मराठीत विचारले.
"दिवसेंदिवस तुम्ही भरमसाट वृक्षतोड करताय...ती थांबवा अगोदर.." त्याने माझ्याकडे हेतू स्पष्ट केला.
मी थोडा बावरलो....मला नक्की काय ते कळेना. तो पुढे म्हणाला, "अरे आंबा, चिंच, वड...ही आमची राहण्याची ठिकाणं ...आमची घरं...आणि तीच तुम्ही नष्ट करत चालला आहात...आमचे संसार उघड्यावर पडत चाललेत तुम्हा माणसांमुळे !!"
च्यामारी....हे तर आखरीतच म्हणायचे ! मी यादृष्टीने कधी विचारच केला नव्हता.
"एकवेळ आमचंही जाऊद्या..." तो पुढे सांगू लागला..
"आम्ही काय घेऊ जुळवून कसंतरी पण जंगलं नष्ट झाल्याने त्या बिच्चाऱ्या पशूपक्ष्यांचे किती हाल चाललेत कधी विचार केलाय??"
त्याने माझ्यासमोर अगदी इमोशनल प्रसंग उभा करण्याचा प्रयत्न केला.
"हे ग्लोबल वार्मिंग होतंय, पाऊस पडत नाहीय, निसर्गचक्र बिघडलंय..." एकेक करता त्याने सगळेच विषय माझ्यापुढे ठेवले आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू टपकू लागले...तोही भावनाविवश झाला होता...तो उलट्या पायांनी घराबाहेर जायला निघाला परंतू जाताना त्याने माझ्याकडून अगदी ठास्सून वचन घेतले...
वचन असे होते....."मी आजपासून झाडे तोडणार नाही...आणि खुप झाडे लावण्याचा प्रयत्न करीन."
मी त्याला मनापासून वचन दिले आणि तो घराबाहेर निघून गेला....बहुतेक प्रत्येकाच्या घरी जाऊन जनजागृती करण्याचा त्याने विडाच उचलला होता...
या स्वप्नाने माझी झोपच उडवली होती. लवकर ऊठलो. नर्सरीत जाऊन दहा झाडे आणली. खड्डे आदल्या दिवशीच मारले होते. गावातल्या माणसाला हाताशी घेऊन मी दहा झाडे लावली....
आणि हो...मी एवढ्यावरच थांबणार नाहीय. आता 'झाडे लावा, झाडे जगवा' हि माझी नित्याची जबाबदारी असणार आहे...
___________________________
लेखन:- प्रविण निकम

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा