"विद्यार्थ्यांनो बरोब्बर तीन दिवसांनंतर तुम्ही तुमचे मॉडेल याठीकाणी सर्वांसमोर सादर करायचे आहे." आपले डोळे थोडेसे किलकिले करुन प्रोफेसर वांगी मुलांना सांगत होते.
अकरावी आर्ट्सच्या मुलांना थोडे नवलच वाटले. प्रोफेसर त्यांच्या टॅलेंटची परीक्षा घेऊ इच्छीत होते. पण मॉडेलचा विषय ऐकून जवळजवळ सर्वच विद्यार्थी बुचकळ्यात पडले होते.
"सर, विषय चेंज करुन दिलात तर बरे होईल." प्रियाने आपले मत व्यक्त केले परंतू प्रोफेसरांनी नकारार्थी मान हलवली आणि आता आपल्याला दिलेल्या विषयावरील मॉडेलचेच सादरीकरण करणे अनिवार्य आहे हे सर्व विद्यार्थी ओळखून गेले.
आणि मॉडेलचा विषयही तसा जरा आगळा वेगळाच होता..."आदर्श माणूस !"
या विषयावर काय डोकेफोडी करायची याचाच ज्याच्या त्याच्या मनात विचार सुरु होता. कँटीनमध्येही वडापाव खाताखाता हीच चर्चा रंगली होती. काहीजणांना आज वडापावही घशाखाली उतरत नव्हता. याला कारणही तसेच होते. जो उत्कृष्ट मॉडेल बनवेल त्याला त्या ज्यूनिअर कॉलेजचा जीएस म्हणून नेमले जाणार होते. आणि योग्य जीएस निवडला जावा म्हणून आता मुलांच्यातही चर्चा झडू लागल्या होत्या. त्यातूनच स्वभावधर्मानुसार गट पडू लागले. आणि बघता बघता दोन गट पडले.
प्रोफेसर वांगी तसे शांत स्वभावाचे. आदर्श व्यक्ती खरेतर त्यांच्यातच दडली होती. पण आज त्यांनीच हा विषय दिला होता त्यामुळे त्यांना नक्की काय अपेक्षीत होते हेच मुलांच्या लक्षात येईना....
मुलांचा पहिला दिवस फक्त विचार करण्यातच गेला. कुणालाच काही सूचत नव्हते. मॉडेल नक्की कसे बनवायचे, सादरीकरण काय अन् कसे करायचे याबाबतीत प्रोफेसरांनी मुलांना पूर्णपणे सूट दिली होती. फक्त मॉडेल मधून सर्वात आदर्श माणूस व्यक्त व्हावा एवढीच काय ती त्यांची माफक अपेक्षा होती...
खरेतर प्रोफेसर वांगी हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असत पण आताचा विषय जरा वेगळाच होता. मॉडेल कसे करायचे याची मुलांना चिंता होती. त्यांना जीएस होण्याची हाव अथवा आवड नव्हती पण आपल्या आवडत्या प्राध्यापकांना आपले मॉडेल कसे वाटेल, किती आवडेल याची थोडी भीती आणि उत्सुकताही होती.
मुळात प्राध्यापकांना मुलांचं भविष्य आणि कुमार वयातल्या जाणीवा समजून द्यायच्या होत्या आणि त्या दृष्टीने मुलेही विचार करीत होती. वांगी सरांना आपलं मॉडेल आवडावं म्हणून जणू विद्यार्थ्यांत स्पर्धाच लागली होती आणि कॉलेज हे नाविन्यपूर्ण उपक्रमांचे जणू एक केंद्रच बनून गेले होते.
आधीच कॉलेजमध्ये दोन ग्रुप झाले होते म्हणजे आता दोन गटात उत्कृष्ट मॉडेल बनविण्याची जणू स्पर्धाच सर्वांना दिसत होती. हे दोन्ही ग्रुप प्रोफेसर वांगीसरांना आपले मॉडेल कसे आवडेल व ते कसे खुश होतील हा विचार करण्यातच गुंतले होते.
आता कॉलेज कॅन्टीनचं रुपांतर जणू कॉन्फरन्स हॉल मध्ये झालं होतं आणि सर्वांच्या विचारांची चक्र फिरु लागली होती की नेमकं करायचं काय...!
प्रियालाही अगदी काही सुचेनासं झालं होतं, कारण आदर्श माणूस हे मॉडेल म्हणून घ्यावं की जीवनशैली म्हणून काही कळतच नव्हतं.
शेवटी खुप विचार केल्यावर रुळलेल्या वाटेनं न जाता अगदी वेगळ्या वाटेनं जावं आणि समाजातल्या माणसांच्या गर्दीत माणुसकी जपणारी माणसं शोधावी आणि त्यांना एक मॉडेल म्हणून नव्हे तर एक जीवनशैली म्हणून बघावं हे ठरलंच. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने मनाशी खुणगाठ बांधली होती ती म्हणजे आदर्श माणूस शोधून काढण्याची.
...ठरल्याप्रमाणे मुलांनी तो शोध सुरु केला. खरंतर हा शोध खुप कठीण होता परंतू या मुलांसाठी तो सोपा बनला होता कारण 'पुस्तकात आदर्श शोधण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून समाजात बघावं' ही वांगी सरांची शिकवण त्यांच्या चांगलीच लक्षात होती.
आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली होती. प्रत्येक विद्यार्थी आता आदर्श माणसाचा शोध घेऊ लागला. तसं पाहता मुलांकडे वेळ कमीच होता. या कमी वेळातच त्यांना आदर्श माणूस शोधून त्याचा अभ्यास करुन मॉडेलही ठरवायचं होतं.
आदर्शाच्या प्रवासात मुले खुप ठिकाणी फिरली. लहान मोठ्या वाड्या-वस्त्यांना त्यांनी भेटीही दिल्या आणि तिथल्या लोकांच्या समस्या व त्या समस्या सोडवणारी माणसं ती शोधू लागली. पण हजारो मैलांचा प्रवास करुन हवं तसं यश मुलांना मिळत नव्हतं.
ही सर्व मुलं अगदी त्यांच्या लहानपणापासूनच ज्यूनिअर कॉलेजच्या समोरील खासगी अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली होती. ज्यूनिअर कॉलेजवर प्राध्यापक असलेले वांगी सरच ते अनाथाश्रम देणग्या गोळा करुन चालवत होते. आई-बापाविना असलेल्या या पोरांना त्यांनी कधीही आईवडीलांची कमतरता भासू दिली नव्हती इतकी प्रेमाने ते या मुलांची काळजी घेत असायचे. आता मोठी झालेली ही मुले कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत होती.
अशा प्रकारे लहानपणापासूनच वांगी सरांच्या विचारांत वाढलेली ही मुलं आज 'आदर्श माणूस' या मॉडेलच्या शोधात कितीतरी ठिकाणी फिरत होती.
शेवटी आदर्श माणूस न मिळाल्यानं हताश झालेली ही मुलं परत आली आणि निशब्द झाल्यासारखी हॉस्टेलच्या पायरीवरच बसली.
वातावरणात जणू स्मशान शांतता पसरली होती. कुणाच्या तोंडून साधा 'ब्र' ही निघत नव्हता. बोलण्याची इच्छा जरी असली तरी मुलांमध्ये आता शक्ती उरली नव्हती.
मॉडेल शिवाय आपल्या लाडक्या प्राध्यापकांच्या पुढे कसं उभं राहावं हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. या विचारांत सगळी मुले मग्न असतानाच अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि समोरच्या चिंचेच्या झाडावरच्या घरट्यातून एका पक्ष्याचं पिल्लू खाली पडलं. प्रियाने ते पाहीलं आणि ती झटकन ऊठली. तिने पिल्लाला उचललं आणि गोंजारु लागली. सचिनने त्याबद्दल प्रियाला हटकलं आणि पिल्लाला परत घरट्यात ठेऊन दिलं.
विद्यार्थ्यांचे दोन्ही गट त्या हॉस्टेलच्या पायरीवरुनच घरट्याकडे कुतूहलाच्या नजरेने पाहत होते. थोड्या वेळानं दोनचार पाखरं त्या ठिकाणी आली आणि त्या पिल्लाला चोचीने मारु लागली. सारेजण त्या दृश्याकडे अगतिकतेने व हताशपणे पाहू लागले.
इतक्यातच प्रविणच्या डोळ्यांत एक वेगळीच तगमग दिसू लागली आणि त्याने त्या सर्वांनाच वरच्या दिशेला लक्ष देण्यास सांगीतले. आकाशात विजेचा लपंडाव चालू होता. आणि एक घार चित्कारत वरुन घिरट्या घालत होती. पापणी लवते ना लवते तोच घारीने वाऱ्याच्या वेगाने खाली येत घरट्यातील पिल्लाला चोचीत पकडले आणि ती उडून गेली आकाशात !
क्षणात घडलेले हे दृश्य पाहून सर्व मुलांचे मन हेलावले. त्यांचे डोळे ओले झाले होते. एक जीव क्षणात मारला गेला होता ज्याला अजून नीटसे जग कळले नव्हते.
सर्वांचे चेहरे पडले होते.
आणि हे दृश्य पाहता पाहता त्या सर्वांची नजर गेली समोरच्याच अनाथाश्रमाकडे ज्यावर मोठ्या अक्षरांत लिहीलं होतं 'आपलं घर !'
जिथे एवढे कोवळे जीव आजपर्यंत फुलांसारखे जपले गेले होते. सर्वांच्या नजरा आता एकटक त्या अनाश्रमाकडे होत्या....
....कारण त्या अनाथाश्रमात बसला होता एक महान असा 'आदर्श माणूस'....तो म्हणजेच प्रोफेसर वांगी सर !!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा