बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

अपहरण

संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या तयारीत होता. १२ वर्षांचा बंटी बंगल्याच्या आवारातच त्याच्या लहान भावासोबत क्रिकेट खेळण्यात मग्न होता. त्याची मम्मी डिनरच्या तयारीत गुंतली होती. पप्पा मिस्टर साठे अजून ऑफीसमधून घरी आले नव्हते. बंटीने बॉल फुलटॉस टाकला. साहूने छोट्या बॅटने तडाखा दिल्याबरोबर बॉल दूर गेला. बंटी बॉलमागे पळाला. इतक्यात अचानक कुणीतरी छोट्या साहूवर झडप घातली..साहू ओरडू लागला. बंटीने ते पाहील्यावर त्याला तर धक्काच बसला.

कुणीतरी साहूला चार चाकांच्या गाडीत कोंबले होते. आणि गाडी बंटीच्या नजरेसमोरुन दिसेनाशी झाली होती. बंटी रडवेला होऊन धावतच घरात आला.

"मम्मीsSS....पप्पाsSS...!"

बंटी काय बोलतोय हेच त्याच्या मम्मीला कळेना...

"मम्मी साहूला कुणीतरी नेले..."

बंटीचे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच त्याच्या मम्मीने बंगल्याच्या बाहेर धाव घेतली. साहू तिथे कुठेच नव्हता. आईने इकडे तिकडे शोधाशोध केली पण साहू सापडला नाही तेव्हा मात्र तिने हंबरडा फोडला. पण तरीही धीर सोडला नाही. ताबडतोब तिने साहूच्या पप्पांना फोन केला. ते सुद्धा लगबगीने कंपनीतून घरी दाखल झाले. योगायोगाने बंगल्याचे सिक्यूरिटी गार्डही आज सुटीवर होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी लगेचच पोलिस स्टेशन गाठले. तक्रार नोंदविली गेली. आणि पोलिस तपास सुरु झाला.

रात्र झाली. पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरत होती पण अद्यापी प्रकरणाचा काहीच मागमूस लागत नव्हता. अखेर पोलिसांनी काहीही करुन साहूला परत आणण्याचे ठोेस वचन दिल्यावर नाईलाजाने का होईना पण त्याचे मम्मी पप्पा घरी परतले.

बंटी, त्याची मम्मी, पप्पा मिस्टर साठे आणि त्यांच्या मालकीच्या कंपनीतील काही विश्वासू स्टाफ मेंबर असे सगळेच घरी काळजीत बसले होते. सर्वांचे लक्ष फोनकडे होते. पोलिसांचा फोन येईल आणि साहू सापडल्याची बातमी कळेल या भोळ्या आशेवर सर्वजण रात्रीचे १२ वाजले तरी बसून होते. काय करावे कुणाला काहीच कळत नव्हते.

आणि अचानक फोन खणखणला !

"बऱ्या बोलाने उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत ५० लाख रुपये आम्ही सांगतोय त्या ठिकाणी आणून द्या...आणि हो, पोलिसांत गेलात तर याद राखा, परिणाम वाईट होतील."

फोनवरचे हे वाक्य ऐकून सारे हबकलेच ! आता काय करायचे अशा विचारांत सारे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले.

"पण पण...साहू.." मि. साठेंचे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच पलिकडून फोन ठेवला गेला.
आणि मग सुरु झाली पन्नास लाख गोळा करण्याची केविलवाणी धडपड. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने बँकेतील थोडीफार रक्कमही काढता येणे शक्य नव्हते. घरात तर तुटपूंजी रक्कम होती. पण प्रश्न होता पन्नास लाखांचा !

दुसरा दिवस उजाडला. मि. आणि मिसेस साठेंना रात्रभर झोप लागली नव्हती. सकाळी पहाटेच दोघेही आपल्या कारमधून कंपनीत गेले. मग त्यांच्या सर्व कामगारांना कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलावले. तोवर बातमी कामगारांपर्यंत पोहोचली होती.

"कृपया आपल्या जवळ किंवा घरी जेवढी काही रोख रक्कम असेल तेवढी मला ताबडतोब आणून द्या मी त्याची दुप्पट तुम्हाला देईन !" वेळ कमी असल्याने मि. साठेंनी कामगारांपुढे हात जोडले. आणि मग कामगारही मशीनसारखे कामाला लागले. कुणी खिशातल्या दहाच्या नोटा काढल्या, कुणी पाकीटात बरेच दिवस जपून ठेवलेली पाचशेची नोट साठेंच्या हातावर ठेवली. कुणी घरी धावत जाऊन हजार-दोनहजार आणून दिले. कंपनीतील दोनशे कामगारांनी आपापल्या परीने रक्कम आणून दिली.

सकाळचे दहा वाजले. पण रक्कम जमली होती जवळजवळ फक्त ५ लाख रुपये. आता काय करावे काहीच कळत नव्हते. मि. साठे काळजीत पडले. थोडासा अवधी मिळाला असता तर त्यांनी पैशांचा डोंगर उभा केला असता परंतू आता तर फक्त १ तास उरला होता. आणि अजून रक्कम हवी होती ४५ लाख रुपये !

आणि अचानक मि. साठेंचा चेहरा खुलला. त्यांना काहीतरी आठवल्यासारखे झाले. ते पत्नीला कारमध्ये बसवून तडक बंगल्यावर गेले. बंगल्याच्या मागच्या भागात त्यांनी दहा दिवसांपूर्वी लपवलेला 'ब्लॅक मनी' त्यांना आठवला. इन्कमटॅक्सवाल्यांची घरी धाड पडणार अशी कुणकुण लागल्याने त्यांनी पाचशेच्या नोटांचे बरेचसे बंडल्स जमिनीतील लॉकरमध्ये दडवून ठेवले होते. त्यांनी कुदळ घेतला. आणि ते लॉकरपर्यंत खणू लागले. बायकोला या गोष्टीचा थांगपत्ताही नव्हता ! ती रडवेल्या चेहऱ्याने नुसतीच पाहत होती.

थोडे खणून झाल्यावर मि. साठेंनी लॉकर उघडला. आणि नोटांची पुडकी बाहेर काढली. परंतू पुढ्यातले दृश्य पाहून त्यांची बोबडीच वळाली. जवळजवळ सर्वच नोटांना वाळवीने खाऊन टाकले होते. त्यांचा मातीत लपवलेला हा काळा पैसा जणू मातीमोल झाला होता. आता मात्र त्यांना रडू कोसळले. पैसे न दिल्याने किडनॅपर साहूचे काही बरेवाईट करतील या काळजीने त्यांना रडायला आले. ११ वाजायला पाच मिनिटे बाकी होती आणि घरातला फोन खणखणला...

दोघे पती पत्नी फोनकडे धावले. मि. साठेंनी फोन उचलला.

"पैसे घेऊन मुकाट्याने मी सांगतोय त्या ठिकाणी या.." पलिकडून सूचना आली.

"पण..पण...मी पन्नास लाख नाही आणू शकत." मि. साठें थरथरत म्हणाले.

"जेवढे असतील तेवढे आणा"

"बरं...पत्ता सांगा ना..." थरथरल्या आवाजाने ते म्हणाले.

पलिकडून पत्ता दिला गेला. पत्ता एका चाळीतल्या खोलीचा होता. मि. साठे पत्नीसह गोळा केलेले पाच लाख रुपये घेऊन कारमध्ये बसले. साहू सुरक्षित परतून यावा म्हणून त्यांनी किडनॅपरच्या फोनची कल्पना पोलिसांना अजिबात दिली नाही. आता ते स्वत:च पैसे घेऊन निघाले होते.

सांगीतलेल्या पत्त्यावर साठेंच्या गाडीला ब्रेक लागले. चाळीतली घरे साधीसुधी वाटत होती. माणसेही साधी मध्यमवर्गीय होती.

'अपहरणकर्ते इथे का लपून बसले असावेत?' असा शंका वजा प्रश्न साठेंना पडला. सांगीतलेली खोली समोरच होती. मि. साठेंनी दार ढकलले. आतमधले दृश्य पाहून दोघेही हबकून गेले. एका दहा वर्षांच्या अपंग मुलासोबत साहू चक्क खेळत होता. आईचे डोळे भरुन आले. ती धावतच गेली आणि साहूला करकचून मिठी मारुन ढसाढसा रडू लागली. त्याच्या बाबांनाही अश्रू अनावर झाले होते. पण साहूला कुणी किडनॅप केले हे त्यांना जाणून घ्यायचे होते. म्हणून ते आतल्या खोलीत गेले. तिथे आतल्या खोलीत एका हार घातलेल्या स्त्रीचा फोटो लावलेला होता. आणि फोटोसमोर कुणीतरी एक माणूस बसला होता. थोडा अंधार असल्याने त्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.

"आणले का पैसे?" त्या माणसाने विचारले.

"हो आणलेत. पण तू आहेस तरी कोण रे?"

"जरा ते लाईटचे बटन दाबा मग कळेल."

मिस्टर साठेंनी तत्परतेने बटनावर हात नेला. लाईट लागला. समोर पाहतात तर काय ! तो त्यांच्याच कंपनीतील तो उदय घाडगे होता ज्याला मि. साठेंनी एकदा कंपनीतून हाकलून दिले होते.

"हो साहेब, मीच तो ज्याने तुमच्या मुलाला किडनॅप केले आणि फोन करुन तुम्हाला पैसे आणायला सांगीतले.."

"पण तू असे का केलेस?" मि. साठेंचा आवाज आता चढला होता.

"मी असे का केले? आठवा तो दिवस साहेब मी तुमच्याकडे कामाला असताना एकदा पाच लाख रुपये मागायला आलो होतो. रडून रडून विनवण्या केल्या, हातीपाया पडलो पण बॉस म्हणून तुम्हाला जराही दया नाही आली. तुम्ही मला ते दिले नाहीतच उलट माझं काही एक ऐकून न घेता उलट तुम्ही मला कामावरुन काढून टाकलंत !"

"अरे पण मी का म्हणून द्यायचे पाच लाख विनाकारण..." मि. साठे चढ्या आवाजातच बोलले.

"मग आज हे पाच लाख का घेऊन आला आहात माझ्या घरी?" उदय घाडगेच्या या प्रश्नावर साठे निशब्द झाले.

इतक्यात उदय घाडगेचा दहा वर्षे वयाचा पायांनी अपंग असलेला मुलगा जमिनीवर खुरडत बाहेरील खोलीतून आत आला.

"साहेब पाहीलंत याच्याकडे? तुम्ही मला जेव्हा कामावरुन काढलंत ना तेव्हाच हा अपंग झाला. माझ्या या वारसदाराची काय अवस्था झालीय पहा ना...!" उदयच्या बोलण्यात आर्तपणा होता. तो समोरच्याच हार घातलेल्या पत्नीच्या फोटो जवळ गेला आणि हुंदके देत म्हणाला,

"साहेब पाहीलंत हिला? ही माझी अर्धांगीनी ! पण आज नाहीय हो जगात !! जेव्हा गावाला जाताना आमच्या गाडीला भीषण अपघात झाला ना तेव्हा हीला तातडीने हॉस्पीटलला नेले होते. डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करायचे म्हणून २ लाख जमा करायला सांगीतले. पोराच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होते. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्याचेही ताबडतोब ऑपरेशन करायचे होते....गरज होती ती फक्त पैशांची आणि तीही अगदी वेळेवर ! मी तुमचा विश्वासू कामगार म्हणून आशेने तुमच्याकडे धावलो. पाच लाखांसाठी दया याचना केली पण तुमचे हृदय नाही पाझरले. मी एवढे पैसे मागीतले म्हणून तुम्ही मला चक्क कामावरुनच काढून टाकलेत. त्याचक्षणी माझ्यावर आभाळ कोसळले. मी हारलो होतो. बहुतेक माझ्या अर्धांगिनीनेही ते ओळखले असावे. सोडला जीव तिने...गेली बिच्चारी !! आणि हा माझा बच्चू, बघा जरा याच्याकडे साहेब. हा जेव्हा असा खुरडत चालताना आजही माझ्याकडे आशेने बघतो ना तेव्हा मला मेल्याहून मेल्यासारखे होते. म्हणूनच काल त्याला मोठ्या आशेने डॉक्टरांकडे नेला होता मी. डॉक्टर म्हणाले अजूनही मेंदूचे ऑपरेशन केले तर पाय नीट होऊ शकतात. माझी परिस्थिती नाही साहेब एवढा खर्च करण्याची...आणि मग मी विचार केला. आपले काही का होईना पण पोराला पायांवर उभा करायचाच. या सगळ्याला तुम्ही कारणीभूत होतात म्हणून मी हा मार्ग तुमच्यावरच वापरायचे ठरवले. पण नाही...हा चुकीचा मार्ग माझ्या रक्तातच नाहीय. साहेब तुम्ही मला पोलिसांत द्या पण काहीही करुन माझ्या एकूलत्या एक पोराला त्याच्या पायावर उभा करा..."


उदय हात जोडून विनवणी करत होता. मि. साठेही भावनाविवश झाले होते. ते पुढे झाले आणि त्यांनी उदयच्या पायांना हात लावला.

"मी चुकलो. मी हिमालयाएवढी चुक केलीय. मला माफ कर उदय !" मि. साठे आर्जव करु लागले....

"पोटच्या पोराचे दु:ख काय असते ते मलाही तुझ्यामुळेच कळालेय आज उदय. खरंच मी चुकलो."

उदयच्या डोळ्यांतून पाणी आले. तो मिस्टर साठेंकडेकडे अश्रू पुसत पाहू लागला. त्याला आता काय बोलावे तेच समजत नव्हते.

"उदय, तुझ्या मुलाच्या ऑपरेशनचा सगळा खर्च मी करेन. आता मी आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे. तू नको काळजी करुस. तुझ्या मुलाला आपण चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊ..." असे म्हणून ५ लाख रुपयांची बॅग त्यांनी उदयकडे सुपूर्त केली...

इतक्यात बाहेरुन साहू त्याच्या आईसोबत आत आला....

"बाबा, मला इथे या दादासोबत खेळायला खुप मज्जा आली. हा दादा आणि काका खुप चांगले आहेत."

मि. साठेंना आता खुपच अपराध्यासारखं वाटू लागलं. ते उदयचा निरोप घेऊन बाहेर पडले. आणि इथून पुढे आपल्या कमाईतला मोठा हिस्सा गरीब, गरजूंसाठी द्यायचा असा त्यांनी मनोमन विचार केला आणि ते घरी निघाले.

※—※—※—※—※—※—※—※—※—※

लेखक- श्री. प्रविण निकम


मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

वनिता जागीर

दर पाच दहा मिनिटांनी छनछन असा आवाज होत होता. आवाज झाला की तिची नजर भांड्याकडे वळत होती...पुन्हा डोके वर करुन छोट्याशा नजरेने ती वरच्या दिशेला पाहायची आणि थोडं स्मितहास्य करुन मग पुन्हा पुढच्या 'छनछन'ची वाट पाहायची. खाली जमीन आणि वर तळपणारा सूर्य...पायात चप्पल नाही अन् अंगातील कपड्यांना ठिगळं लावलेली.

छोटी वनिताला आज मात्र पायाला बसणाऱ्या चटक्यांची तमा नव्हती. तिला कसेही करुन दुपारपर्यंत दीडशे रुपये गोळा करायचे होते. आतापर्यंत शंभर जमले होते. अजून पन्नासाची गरज होती. त्या शहरातल्या नगरपालिका शाळेने शाळाबाह्य मुलांचा सर्वे केला त्यात त्यांना वनिताचा शोध लागला होता. मग वनिता दुपार सत्रांत शाळेत जायला लागली. शिक्षकांनी तिचं नाव वयानुरुप प्रवेश देत डायरेक्ट सहावीच्या इयत्तेत घातलं होतं. ती मराठी गणितात तशी बऱ्यापैकी होती पण पैशांचे मोजमाप तिला अचूक करता यायचे कारण चौकातल्या बस स्टँडजवळ उन्हातान्हात उभे राहून भिक मागून खाण्याची वेळ तिच्यावर आली होती. ती वयाने लहान असली तरी घरची जणू कर्ती मुलगी होती. तिची आई तिच्या लहानपणीच अपघातात वारली होती आणि बाप तर असूनही नसल्यासारखाच होता. दिवसभर भिक मागून मिळवलेल्या पैशाची दारु प्यायची आणि कुठेतरी काहीतरी खाऊन दिवस घालवायचा हा त्याचा दिनक्रम.

शेवटी कसाही असला तरी तो आपला बाप आहे ही जाणीव वनिताला होती. आज तिला दीडशे रुपये मिळवायचे होते कारण चाळीस रुपयांचे चार वडापाव आणि दहा रुपयांच्या तापाच्या गोळ्या तिला तिच्या बापासाठी न्यायच्या होत्या. उरलेले शंभर रुपये तिला चौकात बोर्ड लावलेल्या चित्रकला स्पर्धेत भाग घेण्यासाठी भरायचे होते. स्पर्धा उद्याच्याच दिवशी होणार होती.

वनिताला शाळेकडून एक शाळेचा ड्रेस मोफत भेटला होता. सारखा तोच धुवायचा आणि सुकवून घालायचा असा तिचा दिनक्रम चालू होता. शाळेत जायला लागल्यापासून ती स्वच्छ आणि साफसुधरी राहू लागली. पण तिचा बाप मात्र अजागळ होता. दारुमुळे त्याची हालत खराब झाली होती.

एक माणूस चालत वनिताजवळ आला. त्याने खिशातून काही काढून भांड्यात टाकले आणि तो निघून गेला. नाण्यांचा छनछन आवाज का झाला नाही म्हणून वनिताने खाली भांड्यात पाहीले आणि तिला आश्चर्य वाटले. तो माणूस चक्क पन्नास रुपये भांड्यात टाकून पुढे निघून गेला होता.

वनिताचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती भांडं घेऊन पटकन उठली. सगळे पैसे थैलीत टाकले आणि ती औषधाच्या दुकानाकडे झपझप पावले टाकू लागली. रात्री बापाचं अंग तापलं होतं हे तिच्या लक्षात होतं.

"दादा तापाच्या गोल्या द्याल का ह्याच्या.." वनिता दहाची नोट सरकवत म्हणाली.

मेडीकलच्या मालकाने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि चार गोळ्या दिल्या. गोळ्या थैलीत टाकून वनिता आता वडापवच्या हातगाडीकडे निघाली..

"भाऊ गरम वडापाव दे की रं...बापाला पायजेल.."

गिऱ्हाईकांची गर्दी असल्याने वडापाववाल्याला बोलायला वेळ नव्हता. त्याने पेपराच्या कागदात चार वडे, चार पाव आणि दोन मिरच्या बांधून दिल्या.

आता मात्र जिंकल्याचा अविर्भाव तिच्या डोळ्यांत दिसत होता. ती घरी गेली. घर कसले कापडं बांधून बनवलेला छोटा तंबूच होता तो. बाप हातभट्टी पिऊन नशेत काहीबाही बरळत होता.

"बापा उठ रं..बघ खाऊन घे आनि ह्या गोल्या खा...बघ आंग थंडगार पडल."

तिच्या बापालाही वनिताची काळजी होती पण दारुपुढं त्याची मति गेली होती. चांगलं वाईटाची जाण हरपली होती. त्याला खुप वाटायचं की पोरीला मोठ्ठं कुणीतरी बनवायचं पण दारुने त्याला हतबल बनवलं होतं...

तो उठला. पेपराची पुडी सोडून त्यातल्या वडापावच्या दोन वाटण्या केल्या. पण वनिताने लगेचच आपल्यातला एक वडापाव बापाच्या पुढ्यात ठेवला.

"आगं खा की..."

"नको ...मी खाल्लंय रं मगाशीच...तुजं दोनानी काय व्हतंय बापा...तापात तू जरा खाशील तर दमनार नाहीस...होशील बरा लवकर...खा नि मग औषध खा..."

"वने तू जातेय न्हवं शालेला?"

"व्हय..."

एक वडापाव आणि दोन ग्लास पाणी पिऊन वनिताचं पोट फुल्ल भरलं. रस्सीवरचे शाळेचे कपडे तिने हाताने काढले. केसांना फणी लावली मग पायांच्या गाडीने निघाली शाळेला.

शाळा एक किलोमीटर अंतरावर होती. शाळेतील शिक्षक तिच्याशी खुप चांगले वागायचे मात्र इतर मुले तिला सहसा जवळ घ्यायची नाहीत. कारण होते फक्त एकच...ती चौकात भिक मागायची म्हणून ! पण करणार तरी काय....देव काहींना खुपच खडतर आयुष्य देतो. पण वनिता सारे काही तक्रार न करता सहन करायची...देवाने आयुष्य खडतर दिले असले तरी ते सहन करण्याची शक्ती आणि समज मात्र या छोट्याशा वयात तिला दिली होती.

संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटली. वनिता संध्याकाळीही भिक मागूनच रात्रीच्या खाण्याची सोय करायची. कारण दारुमुळे बाप काम करत नव्हता आणि बालकामगारांना बंदी असल्याने वनिताला कुणी कामावरही ठेवत नव्हते...नाईलाजाने तिला तो मार्ग पत्करावा लागला होता. रात्री सुद्धा वडापाव खाऊनच ते छोट्याशा तंबूत झोपी गेले.

सकाळ झाली. आज रविवार होता. वनिताची ऊठून तयार होण्याची घाई चालली होती. तिने बापाच्या कपाळावर हात ठेऊन पाहीले. अंग गार होतं. मग तिने त्याला हलवलं...

"बापा ऊठ रं..."

"का गं..आज सुट्टी हाय न्हवं?"

"हो रं...माजं काम हाय यक...मी जातेय."

"बर्र जा.." बाप अर्ध्या झोपेच्या तंद्रीत बोलला.

चौकाच्या बाजूलाच असलेल्या हॉलमध्ये आज कुठल्यातरी संस्थेने चित्रकला स्पर्धा आयोजीत केली होती. त्याचा चौकातला बोर्ड वनिताची नजर वेधून घेत होता. प्रथम क्रमांकाचे बक्षीस होते पाच हजार रोख...!

वनिता हॉलमध्ये पोहोचली. अंगात तोच शाळेचा ड्रेस होता. तिने फ्रॉकच्या खिशातून पन्नासची एक नोट आणि बाकीची चिल्लर नाणी बाहेर काढली...समोरच नाव नोंदणी करणारा माणूस बसला होता. वनिताची नजर त्याच्याकडे गेल्यावर तिला मोठे नवल वाटले. तो माणूस तोच होता ज्याने तिच्या भांड्यात पन्नासची नोट टाकली होती...

वनिताने न राहवून त्याबद्दल त्या माणसाला विचारलेच...

"हो गं बाळा...तू चौकात असताना मधून मधून पाच ते सहा वेळा स्पर्धेच्या बोर्डजवळ येऊन गेलीस. तो बोर्ड तू सारखाच निरखून पाहत होतीस. मी ते सारे इथून पाहीले. तुला यात भाग घ्यायचाय हे मी ओळखले...पण तुझी पैशांची अडचण असावी असे वाटले म्हणून मी ते पैसे टाकले..."

स्पर्धा सुरु झाली. कागद, पेन्सील, कलर, पट्टी, रबर सारे काही तिथे स्पर्धकांना फी च्या शंभर रुपयांत पुरवले गेले. वनिताच्या वयाचेच बरेचसे स्पर्धक होते साधारण दहा ते बारा वर्षांचे..

एक तास पूर्ण झाला. स्पर्धा संपली. प्रत्येकाची चित्रे गोळा केली गेली. एक तासाने निकाल जाहीर होणार होता. प्रथम क्रमांकाच्या  विजेत्याला नगरसेवकांकडून पाच हजाराचे बक्षीस दिले जाणार होते...सर्व स्पर्धकांच्या मनाची घालमेल सुरु होती. कोण विजेता ठरेल कुणाला काहीही अंदाज लावता येत नव्हता.

बक्षीस वितरणासाठी नगरसेवकांची गाडी आली. मागे दोन सुरक्षारक्षक होते. रांगेत शेवटी बसलेली वनिता हे सर्व भोळ्या नजरेने पाहत होती...बक्षीस वितरणाला सुरुवात झाली.

"तृतीय क्रमांक मिळाला आहे...." नगरसेवक असे म्हणताच सर्वांचे कान टवकारले गेले...

".....कुमार रोशन वानखेडे शाळा जॉन्सन इंग्लिश मिडीयम स्कूल याला...."

सर्वांनी टाळ्यांनी अभिनंदन केले.

नगरसेवक पुढे बोलू लागले....

"द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेय.....कुमारी श्वेता सिंग, सुभेदार हायस्कूल...."

पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला...

आता मात्र सर्वांचीच ऊत्सूकता ताणली गेली होती. नव्हे शिगेलाच पोहोचली होती !

हॉलमध्ये एकदम शांतता ! टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल इतकी...
आणि नगरसेवकांच्या तोंडून शब्द निघाले.....

"होय...तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या मुलीचे नाव आहे वनिता जागीर नगरपालिका शाळा...$$$"

वनिता भारावल्यासारखी शेवटच्या रांगेतून ऊठली. पण रोज चौकात भिक मागणाऱ्या मुलीला पहिला नंबर मिळाला असल्याने टाळ्यांचा गजर होईना....सगळे सुन्न आणि स्तब्ध झाले होते.

..इतक्यात हॉलच्या दरवाज्या बाहेर कुणीतरी टाळ्या वाजवत आत आलं ! वनिताने कोण म्हणून बाहेर पाहीलं...तिचा बाप होता तो. पोरीला पाहायला सहज चौकात आला होता पण माईकवर पुकारलेले तिचे नाव ऐकताच तो हॉलकडे धावला होता. वनिता भारावून गेली. होती. दरवाजात जाऊन तिने बापाला स्टेजवर आणले. नगरसेवकांनी प्रशस्तीपत्रक आणि पाच हजार रोख बक्षिस तिच्या हातावर ठेवले...आणि अजून एक माणूस आनंदाने टाळ्या वाजवू लागला...

होय...तोच माणूस ज्याने पन्नास रुपये तिच्या भांड्यात टाकले होते...मग जेव्हा स्वत: नगरसेवकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली तेव्हा मात्र सर्वांनीच टाळ्या वाजवल्या. एखादी गोष्ट लगेच पचनी पडत नाही याचे याची देही याची डोळा जिवंत उदाहरण होते ते !

नगरसेवक मात्र त्या पोरीचे कौतुक करताना थकत नव्हते. त्यांना तिचा अभिमान वाटत होता...त्यांनी लगेचच तिला दत्तक घेऊन तिच्या पुढील सर्व शिक्षणाचा सगळा खर्च करीत असल्याचे उपस्थितांसमोर जाहीर केले. दुसऱ्या दिवशी सर्व स्थानिक वर्तमानपत्रांत वनिता झळकली होती. मदतीचे हात पुढे आले. त्या माणसाच्या पन्नास रुपयांनी जणू कमाल केली होती.

राजकारणी फक्त आश्वासने देतात ही सर्वसामान्यांची समजूत पण आज ही मुलगी M.B.B.S च्या दुसऱ्या वर्षाला आहे हे पाहीले तर खात्री पटते की सगळी माणसे सारखी नसतात...माणसांमध्येही काही देवमाणसे असतातच...

आज तिचा बाप छोटेसे दुकान चालवतोय. पोरीची प्रगती पाहून बापही सुधारला होता.

काळ खडतर आयुष्याचेही सोने करु शकतो हेच खरे !
________________________________________
कथा लेखक- श्री. प्रविण निकम


रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

आत्मविश्वासाचा मंत्र

रायपूरचा राजा चंद्रदेव सध्या खुपच चिंतेत होता. त्याचे राज्य खुपच लहान. जेमतेम एक हजाराच्या आसपास सैन्य होतं त्याच्याकडे. त्यामुळेच आसपासचे बलाढ्य राजे रायपूरवर आक्रमण करण्याचा नेहमीच मनसुबा करीत.

एकदा शेजारील ब्रम्हपूरचा बलाढ्य राजा बलदेव हा रायपूरवर आक्रमण करुन ते राज्य जिंकण्याचा विचार करत आहे अशी वार्ता एक गुप्तहेर घेऊन आला. राजा चंद्रदेव काळजीत पडला. कारण राजा बलदेवकडे जवळजवळ २०००० सैन्य होतं आणि राजा चंद्रदेवकडे फक्त १०००.

चंद्रदेव राजाची चिंता वाढू लागली. राजाने अन्नपाणी सोडले. प्रजाही भयभीत झाली. सैन्यही पूरते घाबरुन गेले. संपूर्ण रायपूर नगरीवर जणू भीतीचेच साम्राज्य पसरले होते.

राजा मात्र आता दरबारातील बुद्धीवंतांचा सल्ला घेऊ लागला. दरबारात तशी खुप विद्वान मंडळी होती परंतु बलदेवाचे आक्रमण कसे परतून लावायचे यावर कुणाकडेच काही उपाय नव्हता.

शरणागती पूर्वी शेवटचा उपाय म्हणून राजाने राज्यात दवंडी पिटवली. आक्रमणाविषयी प्रजेला माहीती देण्यात आली. कुणाकडे काही जालीम उपाय असेल तर दरबारात यावे...राजा त्याला सुवर्ण मुद्रांनी मढवून टाकेल असेही सांगण्यात आले...

नेहमीप्रमाणे दरबार भरला. दरबारातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीतीचाच लवलेश होता. राजा, सेनापती अस्वस्थ दिसत होते. इतक्यातच दरबारात एका साधूने प्रवेश केला. लांब दाढी, कपाळाला टिळा लावलेल्या साधूला सेवकांनी राजापुढे हजर केले.

"महाराजांचा जयजयकार असो."

"या साधू महाराज, तुमचे दरबारात स्वागत आहे. युद्धाविषयी,आक्रमणाविषयी आपल्याला काही सांगावयाचे आहे का?"- राजाने चौकशी केली

"होय महाराज, आपण सगळे घाबरुन गेले आहात. कारण आपल्याकडे सैन्य कमी आहे म्हणून."

दरबीरातील सर्व साधूच्या बोलण्याकडे टक लावून पाहू लागले.

"महाराज, निव्वळ सैन्य कमी आहे म्हणून घाबरणे योग्य नाही. सैन्य कमी आहेच परंतु आपण आपला आत्मविश्वासही गमावला आहे.
युद्ध हे सैन्याच्या बळावर लढले जाते हे खरे आहे पण त्याही पेक्षा ते आत्मविश्वासाच्या बळावर जास्त लढले जाते."- साधू.

साधू महाराज आता पुढे काय बोलणार याबाबत राजासह सर्वांचीच ऊत्सुकता वाढली.

"महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतोय. बोलण्यास क्षमा असावी. परंतु आपण मला परवानगी दिलीत तर आपल्या फक्त एक हजार सैन्याच्या बळावरच मी हे युद्ध जिंकून दाखवेन...!!!"

साधूच्या या बोलण्यावर दरबार अवाक् होऊन स्तब्ध झाला. आता पर्यंत ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त पराभवाचेच शब्द होते...पहील्यांदाच कुणीतरी युद्ध जिंकण्याची भाषा बोलले होते. ती व्यक्ती सुद्धा कुणी युद्धातील तरबेज व्यक्ती नव्हती तर ते होते साधू महाराज...

सततच्या जप आणि ध्यानामुळे साधू महाराजांचा आत्मविश्वास खुप मोठा होता.
राजालाही आश्चर्य वाटले. एक साधू युद्ध जिंकण्याची भाषा बोलतोय आणि आपण मात्र ऊगाचच घाबरतोय हे त्याच्या लक्षात आले. आपण घाबरल्याने दरबारातील सर्वांचाच आत्मविश्वास ढळून गेलाय, सैनिकही घाबरुन गेलेत हे राजाच्या चांगलेच लक्षात आले.

कितीही कठीण परिस्थिती असली तरी घाबरुन जायचे नाही, त्या परिस्थितीचा आत्मविश्वासाने सामना करायचा हा मंत्र राजाला नव्याने मिळाला होता...

राजाचा आत्मविश्वास वाढला. दरबारातील प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढला. सैनिकही जोमाने युद्धास तत्पर झाले. प्रजाही आत्मविश्वासाने तळपली.

साधूमहाराजांनी दरबारात येऊन प्रत्येकात आत्मविश्वास फुंकण्याचे महत्त्वाचे काम केले होते. राजाने देऊ केलेल्या सुवर्ण मुद्रा न स्विकारताच साधूंनी दरबारातून प्रस्थान केले.

पुढे घनघोर लढाई झाली. राजा चंद्रदेवकडे जरी १००० सैन्य होते तरी ते शत्रूच्या २०००० पेक्षाही जास्त होते कारण त्या एक हजार सैन्याकडे जो आत्मविश्वास होता तो वीसहजार  सैन्यांची तुलना करेल इतका होता.

आत्मविश्वासाच्या बळावर सैन्य तुटपुंजे असूनही राजा चंद्रदेवने युद्ध जिंकले...राज्यात सगळीकडे गोड पक्वाने वाटून आनंद साजरा करण्यात आला....एक नवा मंत्र सगळ्यांना मिळाल्याने आता कुणाच्याच चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता....

लेखन-प्रविण निकम
(जून्या ऐकीव कथेवर आधारीत)


________________________________________

बाप बेटीचं नातं...

लेखन- श्री. प्रविण निकम

श्री. सारंगे ज्यूनीअर कॉलेजवर प्रिंसिपल या पदावर कार्यरत होते. त्यांची शिस्त आणि दरारा आख्ख्या कॉलेजमध्ये प्रसिद्ध होता. त्यांनी बोलायचं आणि इतरांनी त्यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानूनच झेलायचा..असे जणू समीकरणच बनले होते.

सारंगे सरांनी कॉलेजमधील कडक शिस्त घरीही आणली होती. त्यांच्या घरीही जणू सर्व काही शिस्तबद्ध असायचे. सारंगे सरांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला की तो जणू अंतिमच अशीच घरातील सर्वांची धारणा झाली होती. त्यांची बायकोही त्यांना 'सर' म्हणायची आणि स्वत:ची मुलेसुद्धा सरच म्हणायची..! 

सरांनी स्वत:च्या घराचंही जणू शिस्तबद्ध कॉलेजच बनवून टाकलं होतं...जे कॉलेजमध्ये तेच घरी. माणसाचं वागणं सर्व ठिकाणी सारखंच असावं अशा मताचे ते होते...

आज त्यांनी घरातील सर्वांची मिटिंग बोलावली. होय..संवाद नव्हे चक्क मिटिंगच म्हणा !त्यांच्याकडे भावनांचा अभाव होता म्हणा किंवा त्यांनी स्वत:ला तसे बनवले होते म्हणा... ते घरातसुद्धा ते अगदी मशीनसारखेच वागायचे...

"या घरात मी बोलेन तेच फायनल...बाकी कुणाच्या मताला काडीचीही किंमत नाही." सरांनी हुकूम सोडला.

"अहो पण..." बायको बिच्चारी साधी होती.

"तुम्ही तर एकही शब्द बोलायचा नाही आमच्यापुढे.." घरगूती मिटिंगमध्ये जणू फतवा निघाला.

मुलं बिच्चारी अगदीच गप्प होती. त्यांची तेवढी समजही नव्हती. ती नुसतीच धाक म्हणून तिथे बसायची....तोफेच्या तोंडी फक्त त्यांच्या आईलाच जावे लागायचे. ती सुद्धा पोरांसाठी मुग गिळून गप्प राहायची....

त्यांच्या घरात जणू हुकूमशाही होती...प्रेम, आपुलकी, आपलेपणा या गोष्टी कित्येक मैल दूर होत्या...

मुलांनाही पप्पा हवे होते..पण तशी सोय नव्हती...वातावरण नव्हते. मुलांची आईसुद्धा हतबल झाली होती. काहीतरी चमत्कार होईल अन् यांचे वागणे बदलेल या एकाच आशेवर बिच्चारी तग धरुन होती...

सरांच्या अशा वागण्याचे एक कारण मात्र मुलांनी शोधून काढले होते. सरांना कॉलेजात कामाचा खुपच लोड असतो. म्हणून ते घरी अशी चिडचिड करतात हे मुलांनी पुरते ओळखलेले होते.

औपचारीक मिटिंग संपली होती. सर्वजण जेवणाच्या निमित्ताने पंक्तीला बसले होते.
सरांना दोन मुलं होती. मुलगी मानसी आणि मुलगा दिनेश...मानसी पाचवीत होती आणि दिनेश सातवीत.

आज रात्री जेवताना मुलांच्या आईने सर्वांना जेवण वाढलं होतं...प्रत्येकाच्या पुढ्यात मेथीची भाजी, चपाती, आमटी आणि भात वाढला होता. वाढल्यानंतर लगेच काहीही न बोलता खायला सुरुवात करायची ही सरांची शिस्त होती. दिनू आणि सरांनी सुरुवात केली होती पण मानसी मात्र शांत होती.

"तुझ्या घशाखाली घास जात नाहीय का? गिळवत नाहीय वाटतं.." सरांच्या मशीनमधून शब्द बाहेर पडले.

"मानसी, राणी खा गं...सर सांगताहेत ना.." आई म्हणाली.

"आई मला भूक नाहीय गं.." मानसीचे निर्वीकार उत्तर.

सरांनी मानसीकडे रागाने एक कटाक्ष टाकला.
मानसीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण नाराजी दिसत होती. पण सरांना त्याची काहीच पर्वा नव्हती. रात्री सर्वजण झोपी गेले.

सकाळ झाली. सर शाळेत जाण्यासाठी तयार होत होते. दिनेशही ऊठला होता. आईची टिफीन तयार करण्यासाठीची लगबग सुरु होती. परंतू रोज लवकर उठणारी मानसी मात्र आज उठली नव्हती. घड्याळात आठचे ठोके पडले. आई काळजीने मानसीजवळ आली आणि तिला हलवून उठवू लागली.

"राणी, अगं उठतेस ना...उशिर झालाय शाळेला जायला. उठ पटकन..."

"आई, अगं मला जावंसं वाटत नाही गं आज शाळेला.." छोटीशी मानसी म्हणाली.

मानसीचं हे वाक्य सरांच्या कानी गेलं. तणतणतच सर बेडरुममध्ये आले.

"काय झालंय तुला? काय धाड भरलीय शाळेत जायला....?"

मानसी गप्प होती.

"मी काय म्हणतोय, कान बहिरे झाले आहेत काय तुझे.....मुकाट्याने उठायचं आणि शाळेत निघायचं. मला बाकी काही माहीत नाही."

"अहो तिला नाही जायचं आज तर राहूद्या...कशाला सक्ती करायची..." मानसीची आई बोलली.

"फुकटचं मिळतय ना...म्हणून हे सूचतंय तुम्हाला...कशी नाही शाळेत जात तेच बघतो.."

सरांच्या शरीरात जणू हुकूमशहा शिरला होता. त्यांनी मांजरांना हाकलायची काठी उचलली आणि झोपलेल्या मानसीवर एकच फटका ओढला....

"उठ....उठ म्हणतोय ना....जातेस की नाही शाळेत...."

मानसीला बसलेल्या फटक्याने ती तळमळली....सहन न होण्याइतपत तो फटका तिने कसाबसा सहन केला..डोळ्यांतून पाणी घळाघळा बाहेर पडलं पण तोंडातून रडण्याचा आवाज जराही बाहेर पडला नाही...
मुलांनी आपली सहनशक्ती जणू वाढवली होती.

"या घरात मी सांगेन तस्सच झालं पाहीजे. कुणीही आपला शहाणपणा चालवायचा नाही." सरांनी हिटलरी फर्मान सोडलं.

पण मानसी काही सरांच्या फर्मानाला जूमानली नाही. ती अंथरुणावर ऊठून बसली पण शाळेत जायला काही राजी होत नव्हती.

आता मात्र सरांच्या इगोचा कडेलोट झाला. 'आपली मुलगी आपलं ऐकत नाही म्हणजे काय'...या एकाच विचाराने त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला होता. 

त्यांनी मानसीचा हात धरला आणि तिला फरफटत आंघोळीसाठी बाथरुममध्ये नेऊ लागले. पोरांना याची सवय होती...पण आज सरांना मात्र थोडे विचित्र वाटले. मानसीला ओढताना त्यांचा हात गरम झाला होता. मानसीचं अंग तापाने फणफणलय याची त्यांना पुसटशी जाणीव झाली. मानसीच्या अंगात अजिबात त्राण नव्हता. ती जणू अर्धवट शुद्धीत होती. काय घडले म्हणून किचनमधून तिची धावतच आली. पाहते तर मानसीची शुद्ध हरपलेली होती. 

मानसीची आई ते दृश्य पाहून ओक्साबोक्शी रडू लागली. राणी तिचा जणू जीव की प्राण होती. काय करावे हे तिला कळेना...

"अहो...का एवढे निष्ठूर होताय, उचला की राणीला, चला न्या की पटकन दवाखान्यात...!"

सरांच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही कुठेतरी माणूसकी शिल्लक होती. त्यांनी लगबगीने मानसीला दोन्ही हातांवर उचललं आणि ते बाहेर धावले. त्यांच्या हाताला चटके बसतील इतका ताप मानसीच्या अंगात होता. बाहेर आल्यावर तिची आई रिक्षाला हात करुन थाबण्यासाठी आर्जव करु लागली. अखेर एक रिक्षा थांबली आणि ते रिक्षात बसून जवळच्याच दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी तपासणी करुन लगेचच सलाईन लावली. दोन तासांच्या औषधोपचारानंतर मानसी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली.

मानसीने डोळे उघडले. समोर तिची आई उभी होती.

"आई, सर कुठे आहेत?" मानसीने प्रश्न केला.

" ते बाहेर बसलेत.."

"आई, माझं एक काम करशील?"

"बोल राणी....नक्की करेन..."

"आई तू बाहेर जा, आणि सरांना पाठवून दे आत..."

मानसीची आईला काही कळायला मार्ग नव्हता. ती थोडी गोंधळली...पण आपल्या आजारी मुलीची इच्छा म्हणून ती बाहेर आली...

"तुम्हाला राणीने आत बोलावले आहे...."

"बरं..." सर गंभीर होते. ते आत गेले. त्यांनी मानसीकडे एक हलका कटाक्ष टाकला. पण मानसी मात्र त्यांच्याकडे अगदीच रोखून बघत असलेली त्यांना दिसली.

"बोल..." सर उद्गारले.

"पप्पा...इकडे या ना..."

सरांना काही कळत नव्हतं...ते तिच्या जवळ गेले. मानसी हलकेच उठून बसली. सरांचा हात तिने आपल्या छोट्याशा हातांत घेतला आणि म्हणाली...

"पप्पा...सकाळपासून उपाशी आहात ना...तुमचे हात किती गरम लागताहेत...ताप तर नाही ना तुम्हाला...थांबा..."

असे म्हणून मानसी धडपडत उठली...रात्री तिने जेवण करावं म्हणून तिचा भाऊ दिनेशने आमिष म्हणून तिला एक कॉफी चॉकलेट दिले होते ते तस्सेच तिच्या फ्रॉकच्या खिशात होते....तिने ते चॉकलेट गुपचूप बाहेर काढले...

"पप्पा 'आ' करा ना...प्लीज.."

मानसीच्या या बोलण्याने दगडाच्या काळजाला सुद्धा पाझर फुटला. सरांनी काही कळायच्या आतच नकळत 'आ' करुन तोंड उघडले आणि मानसीने पटकन त्यांना ते चॉकलेट भरवले...

"पप्पा आता बघा तुमच्यात शक्ती येईल..." मानसीचे भाबडे बोल बाहेर पडले आणि...

सर हुंदके देऊन ढसाढसा रडू लागले....
त्यांच्याकडे आता शब्दच नव्हते. होत्या फक्त भावना....त्यांनी रडता रडता मानसीला आपल्या छातीशी धरले....तिलाही तेच हवे होते...

"मी खूप वाईट आहे गं राणी...."

आज पहिल्यांदाच ते आपल्या मुलीला राणी म्हणाले होते....

"रात्री तुला ताप आला होता म्हणून जेवली नाहीस ना...मग मी ओरडल्यावर सांगीतले का नाहीस.?"

"पप्पा तुम्ही आमच्यासाठी किती काम करता..तुम्ही दमून घरी येता...तुम्हाला आणखी त्रास नको म्हणून नाही सांगीतलं..."

"सकाळीही मी मारलं तरी तू मुकाट्यानं मार खाल्लास बेटा....तू रात्रीपासून उपाशी होतीस, तुला ताप आला होता...तरीही मी तुला मारलं...मी निष्ठूर आहे..."

"पप्पा तुमचा हात मला कधीच लागत नाही.." मानसीच्या डोळ्यांतूनही पाणी आले.

सरांच्या मनाची घालमेल झाली...त्यांनी डोळे पुसले आणि ते तडक बाहेर पडले. मानसीची आई आत आली...तिला तर काही कळायलाच मार्ग नव्हता...

तासाभरात सर परत आले...सोबत मुलगा दिनेश होता. त्याला शाळेत जाऊन त्यांनी आणले होते. त्यांनी दवाखान्यातील त्या रुमच्या दाराला आतून कडी घातली. समोर मुलगा दिनेश, मानसी आणि तिची आई होती...
सरांना गहिवरुन आले. त्या तिघांसमोर त्यांनी सपशेल हात जोडले आणि ते ढसाढसा रडू लागले.

त्यांच्या तोंडात फक्त एकच वाक्य होतं...

"मला माफ करा....मी चुकीचा वागलो...तुम्ही मला हवे आहात...!"

थोडावेळ वातावरणात गंभीरता पसरली...पण थोड्यावेळानंतर मात्र सगळं वातावरण छान, झक्कास झालं...सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी हास्य पसरलं होतं...

तेवढ्यात दारावरची बेल वाजली...

दिनेशने कडी काढली. डॉक्टर आत आले. त्यांनी मानसीला तपासले आणि डिस्चार्ज दिला. सर्वजण दवाखान्याच्या बाहेर आले. 


सरांनी हातातल्या घड्याळात पाहीले. दुपारचे साडेबारा वाजले होते. सरांनी फर्मान सोडलं...
"आता आपण अजिबात घरी जायचं नाही.."

मग काय....पहिल्यांदा आईस्क्रीम..मग जेवण..नंतर सिनेमा...संध्याकाळी गार्डन...मग शॉपींग....

सर्वांनी सरांचं फर्मान अगदी आवर्जून डोक्यावर घेतलं होतं....

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

आदर्श माणसाचे मॉडेल

"विद्यार्थ्यांनो बरोब्बर तीन दिवसांनंतर तुम्ही तुमचे मॉडेल याठीकाणी सर्वांसमोर सादर करायचे आहे." आपले डोळे थोडेसे किलकिले करुन प्रोफेसर वांगी मुलांना सांगत होते.

अकरावी आर्ट्सच्या मुलांना थोडे नवलच वाटले. प्रोफेसर त्यांच्या टॅलेंटची परीक्षा घेऊ इच्छीत होते. पण मॉडेलचा विषय ऐकून जवळजवळ सर्वच विद्यार्थी बुचकळ्यात पडले होते.

"सर, विषय चेंज करुन दिलात तर बरे होईल." प्रियाने आपले मत व्यक्त केले परंतू प्रोफेसरांनी नकारार्थी मान हलवली आणि आता आपल्याला दिलेल्या विषयावरील मॉडेलचेच सादरीकरण करणे अनिवार्य आहे हे सर्व विद्यार्थी ओळखून गेले.

आणि मॉडेलचा विषयही तसा जरा आगळा वेगळाच होता..."आदर्श माणूस !"

या विषयावर काय डोकेफोडी करायची याचाच ज्याच्या त्याच्या मनात विचार सुरु होता. कँटीनमध्येही वडापाव खाताखाता हीच चर्चा रंगली होती. काहीजणांना आज वडापावही घशाखाली उतरत नव्हता. याला कारणही तसेच होते. जो उत्कृष्ट मॉडेल बनवेल त्याला त्या ज्यूनिअर कॉलेजचा जीएस म्हणून नेमले जाणार होते. आणि योग्य जीएस निवडला जावा म्हणून आता मुलांच्यातही चर्चा झडू लागल्या होत्या. त्यातूनच स्वभावधर्मानुसार गट पडू लागले. आणि बघता बघता दोन गट पडले.

प्रोफेसर वांगी तसे शांत स्वभावाचे. आदर्श व्यक्ती खरेतर त्यांच्यातच दडली होती. पण आज त्यांनीच हा विषय दिला होता त्यामुळे त्यांना नक्की काय अपेक्षीत होते हेच मुलांच्या लक्षात येईना....

मुलांचा पहिला दिवस फक्त विचार करण्यातच गेला. कुणालाच काही सूचत नव्हते. मॉडेल नक्की कसे बनवायचे, सादरीकरण काय अन् कसे करायचे याबाबतीत प्रोफेसरांनी मुलांना पूर्णपणे सूट दिली होती. फक्त मॉडेल मधून सर्वात आदर्श माणूस व्यक्त व्हावा एवढीच काय ती त्यांची माफक अपेक्षा होती...

खरेतर प्रोफेसर वांगी हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असत पण आताचा विषय जरा वेगळाच होता. मॉडेल कसे करायचे याची मुलांना चिंता होती. त्यांना जीएस होण्याची हाव अथवा आवड नव्हती पण आपल्या आवडत्या प्राध्यापकांना आपले मॉडेल कसे वाटेल, किती आवडेल याची थोडी भीती आणि उत्सुकताही होती. 

मुळात प्राध्यापकांना मुलांचं भविष्य आणि  कुमार वयातल्या जाणीवा समजून द्यायच्या होत्या आणि त्या दृष्टीने मुलेही विचार करीत होती. वांगी सरांना आपलं मॉडेल आवडावं म्हणून जणू विद्यार्थ्यांत स्पर्धाच लागली होती आणि कॉलेज हे नाविन्यपूर्ण उपक्रमांचे जणू एक केंद्रच बनून गेले होते.

आधीच कॉलेजमध्ये दोन ग्रुप झाले होते म्हणजे आता दोन गटात उत्कृष्ट मॉडेल बनविण्याची जणू स्पर्धाच सर्वांना दिसत होती. हे दोन्ही ग्रुप प्रोफेसर वांगीसरांना आपले मॉडेल कसे आवडेल व ते कसे खुश होतील हा विचार करण्यातच गुंतले होते.

आता कॉलेज कॅन्टीनचं रुपांतर जणू कॉन्फरन्स हॉल मध्ये झालं होतं आणि सर्वांच्या विचारांची चक्र फिरु लागली होती की नेमकं करायचं काय...!

प्रियालाही अगदी काही सुचेनासं झालं होतं, कारण आदर्श माणूस हे मॉडेल म्हणून घ्यावं की जीवनशैली म्हणून काही कळतच नव्हतं.

शेवटी खुप विचार केल्यावर रुळलेल्या वाटेनं न जाता अगदी वेगळ्या वाटेनं जावं आणि समाजातल्या माणसांच्या गर्दीत माणुसकी जपणारी माणसं शोधावी आणि त्यांना एक  मॉडेल म्हणून नव्हे तर एक जीवनशैली म्हणून बघावं हे ठरलंच. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने मनाशी खुणगाठ बांधली होती ती म्हणजे आदर्श माणूस शोधून काढण्याची.

...ठरल्याप्रमाणे मुलांनी तो शोध सुरु केला. खरंतर हा शोध खुप कठीण होता परंतू या मुलांसाठी तो सोपा बनला होता कारण 'पुस्तकात आदर्श शोधण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून समाजात बघावं' ही वांगी सरांची शिकवण त्यांच्या चांगलीच लक्षात होती. 

आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली होती. प्रत्येक विद्यार्थी आता आदर्श माणसाचा शोध घेऊ लागला. तसं पाहता मुलांकडे वेळ कमीच होता. या कमी वेळातच त्यांना आदर्श माणूस शोधून त्याचा अभ्यास करुन मॉडेलही ठरवायचं होतं. 

आदर्शाच्या प्रवासात मुले खुप ठिकाणी फिरली. लहान मोठ्या वाड्या-वस्त्यांना त्यांनी भेटीही दिल्या आणि तिथल्या लोकांच्या समस्या व त्या समस्या सोडवणारी माणसं ती शोधू लागली. पण हजारो मैलांचा प्रवास करुन हवं तसं यश मुलांना मिळत नव्हतं. 

ही सर्व मुलं अगदी त्यांच्या लहानपणापासूनच ज्यूनिअर कॉलेजच्या समोरील खासगी अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली होती. ज्यूनिअर कॉलेजवर प्राध्यापक असलेले वांगी सरच ते अनाथाश्रम देणग्या गोळा करुन चालवत होते. आई-बापाविना असलेल्या या पोरांना त्यांनी कधीही आईवडीलांची कमतरता भासू दिली नव्हती इतकी प्रेमाने ते या मुलांची काळजी घेत असायचे. आता मोठी झालेली ही मुले कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत होती.

अशा प्रकारे लहानपणापासूनच वांगी सरांच्या विचारांत वाढलेली ही मुलं आज 'आदर्श माणूस' या मॉडेलच्या शोधात कितीतरी ठिकाणी फिरत होती. 

शेवटी आदर्श माणूस न मिळाल्यानं हताश झालेली ही मुलं परत आली आणि निशब्द झाल्यासारखी हॉस्टेलच्या पायरीवरच बसली.
वातावरणात जणू स्मशान शांतता पसरली होती. कुणाच्या तोंडून साधा 'ब्र' ही निघत नव्हता. बोलण्याची इच्छा जरी असली तरी मुलांमध्ये आता शक्ती उरली नव्हती.

मॉडेल शिवाय आपल्या लाडक्या प्राध्यापकांच्या पुढे कसं उभं राहावं हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. या विचारांत सगळी मुले मग्न असतानाच अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि समोरच्या चिंचेच्या झाडावरच्या घरट्यातून एका पक्ष्याचं पिल्लू खाली पडलं. प्रियाने ते पाहीलं आणि ती झटकन ऊठली. तिने पिल्लाला उचललं आणि गोंजारु लागली. सचिनने त्याबद्दल प्रियाला हटकलं आणि पिल्लाला परत घरट्यात ठेऊन दिलं.

विद्यार्थ्यांचे दोन्ही गट त्या हॉस्टेलच्या पायरीवरुनच घरट्याकडे कुतूहलाच्या नजरेने पाहत होते. थोड्या वेळानं दोनचार पाखरं त्या ठिकाणी आली आणि त्या पिल्लाला चोचीने मारु लागली. सारेजण त्या दृश्याकडे अगतिकतेने व हताशपणे पाहू लागले.

इतक्यातच प्रविणच्या डोळ्यांत एक वेगळीच तगमग दिसू लागली आणि त्याने त्या सर्वांनाच वरच्या दिशेला लक्ष देण्यास सांगीतले. आकाशात विजेचा लपंडाव चालू होता. आणि एक घार चित्कारत वरुन घिरट्या घालत होती. पापणी लवते ना लवते तोच घारीने वाऱ्याच्या वेगाने खाली येत घरट्यातील पिल्लाला चोचीत पकडले आणि ती उडून गेली आकाशात !

क्षणात घडलेले हे दृश्य पाहून सर्व मुलांचे मन हेलावले. त्यांचे डोळे ओले झाले होते. एक जीव क्षणात मारला गेला होता ज्याला अजून नीटसे जग कळले नव्हते. 

सर्वांचे चेहरे पडले होते.
आणि हे दृश्य पाहता पाहता त्या सर्वांची नजर गेली समोरच्याच अनाथाश्रमाकडे ज्यावर मोठ्या अक्षरांत लिहीलं होतं 'आपलं घर !'
जिथे एवढे कोवळे जीव आजपर्यंत फुलांसारखे जपले गेले होते. सर्वांच्या नजरा आता एकटक त्या अनाश्रमाकडे होत्या....

....कारण त्या अनाथाश्रमात बसला होता एक महान असा 'आदर्श माणूस'....तो म्हणजेच प्रोफेसर वांगी सर !!!

_________________________________
कथालेखक:- Pravin Nikam & Sachin Rana
__________________________________________
टिप:- सदर कथेचा पूर्वार्ध मी लिहीला असून उत्तरार्ध श्री. सचिन राणा सर यांनी लिहीला आहे.


___________________________________________

सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

तो आणि वृक्षारोपण !

कालचीच गोष्ट. वृक्षारोपण करायचे म्हणून दहा झाडे आणली नर्सरीतून. त्यात आंब्याची, चिंचेची, आणि नारळाची झाडे होती. आदल्या दिवशीच गावातल्या एका माणसाला हाताशी घेऊन खड्डे खणून ठेवले होते. 

कालची सकाळही अगदी धावपळीचीच. झोपेतून ऊठलो तोच स्वप्नातून खडबडून जागा होत.



त्याचं झालं असं...रात्री घरात मी एकटाच होतो. घरातले सगळे मामाकडे पाहूणे गेले होते. टिव्हीसमोर रिमोटने एकेक चॅनेल उगाचच पुढे पुढे सरकवत होतो.

...आणि माझ्या हॉलचा दरवाजा धाडधाड वाजू लागला. मी एकटाच असल्याने पुरता घाबरुन गेलो. 'कोण असेल?' याची कल्पनाही करवत नव्हती. कारण आमच्या खेडेगावात आजवर मी खुप विचित्र कथा ऐकल्या होत्या. तरीही घाबरत घाबरत मी दरवाज्यापाशी गेलो.

"कोण?" मी घाबऱ्या आवाजातच विचारले.

"आधी दार उघड मग सांगतो !"

आता तर मी पुरताच घाबरुन गेलो होतो...

मी भूतबीत मानत नाही. पण रात्री बाराच्या दरम्यान असा आवाज ऐकल्याने मी माझी सद्-विवेकबुद्धी जणू हरवून बसलो होतो.

कोंढाणा किल्ला लढवताना जसा मावळ्यांच्या 'लढा नाहीतर मरा' असा आवाज कानी पडला तस्साच आवाज माझ्याही कानात दुमदुमल्यासारखे झाले.

मी डेअरिंग करुन पुढे झालो आणि दरवाजाला हात घातला. सटकन कडी उघडली आणि तो झपकन आत आला.

उलटे पाय...दोन दात बाहेर...अगदी विचित्रच !
हा भूतांच्याच जातीतला आहे हे मी पुरते ओळखले होते.

"बाबारे काय पायजे तुला, तू इथे कशाला आलास?" मी डेअरिंग केली.

"खामोश !" त्याने आवाज टाकला....

मी अजूनच घाबरलो. पण हा काय अमरिशपूरीचा पिक्चर बिक्चर बघतो की काय अशी पुसटशी शंकाही आली.

"मी तुझ्याकडे काही मागायला आलोय..." त्याच्या पुढच्या दोन दातांच्या फटींतून शब्द बाहेर पडले.

"ए बाबा, पैसेबियसे नाहीत हं माझ्याकडे..."

"शट अप !! मला पैसे नको आहेत..."

हा भूत असला तरी सुशिक्षीत वाटत होता. तो चक्क इंग्रजी झाडत होता माझ्या अंगावर...

आता मलासुद्धा इंग्रजी झाडण्याचा मोह झाला आणि मी तशी सुरुवात करणार तोच त्याने माझ्यापुढे लोटांगण घातले आणि 'प्लीज इंग्रजीत नको' अशी मला विनंती करु लागला.

"अरे पण मग तुला हवे तरी काय?" मी मराठीत विचारले.

"दिवसेंदिवस तुम्ही भरमसाट वृक्षतोड करताय...ती थांबवा अगोदर.." त्याने माझ्याकडे हेतू स्पष्ट केला.

मी थोडा बावरलो....मला नक्की काय ते कळेना. तो पुढे म्हणाला, "अरे आंबा, चिंच, वड...ही आमची राहण्याची ठिकाणं ...आमची घरं...आणि तीच तुम्ही नष्ट करत चालला आहात...आमचे संसार उघड्यावर पडत चाललेत तुम्हा माणसांमुळे !!"

च्यामारी....हे तर आखरीतच म्हणायचे ! मी यादृष्टीने कधी विचारच केला नव्हता.

"एकवेळ आमचंही जाऊद्या..." तो पुढे सांगू लागला..
"आम्ही काय घेऊ जुळवून कसंतरी पण जंगलं नष्ट झाल्याने त्या बिच्चाऱ्या पशूपक्ष्यांचे किती हाल चाललेत कधी विचार केलाय??"

त्याने माझ्यासमोर अगदी इमोशनल प्रसंग उभा करण्याचा प्रयत्न केला.

"हे ग्लोबल वार्मिंग होतंय, पाऊस पडत नाहीय, निसर्गचक्र बिघडलंय..." एकेक करता त्याने सगळेच विषय माझ्यापुढे ठेवले आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू टपकू लागले...तोही भावनाविवश झाला होता...तो उलट्या पायांनी घराबाहेर जायला निघाला परंतू जाताना त्याने माझ्याकडून अगदी ठास्सून वचन घेतले...

वचन असे होते....."मी आजपासून झाडे तोडणार नाही...आणि खुप झाडे लावण्याचा प्रयत्न करीन."

मी त्याला मनापासून वचन दिले आणि तो घराबाहेर निघून गेला....बहुतेक प्रत्येकाच्या घरी जाऊन जनजागृती करण्याचा त्याने विडाच उचलला होता...

या स्वप्नाने माझी झोपच उडवली होती. लवकर ऊठलो. नर्सरीत जाऊन दहा झाडे आणली. खड्डे आदल्या दिवशीच मारले होते. गावातल्या माणसाला हाताशी घेऊन मी दहा झाडे लावली....

आणि हो...मी एवढ्यावरच थांबणार नाहीय. आता 'झाडे लावा, झाडे जगवा' हि माझी नित्याची जबाबदारी असणार आहे...
___________________________

लेखन:- प्रविण निकम

बुक माय शो अर्थात रविवारचे प्लॅनिंग !!



नमस्कार मंडळी....
आपण सर्वांनी 'द थलाईवा' अर्थात रजनीकांतचा रोबोट सिनेमा पाहीला असेलच. एका प्रसंगात गरज म्हणून रोबोटच्या पायाची चाके बाहेर येतात आणि तो रेल्वे ट्रॅकवरुन धूम स्टाईलने धावू लागतो...

तर सांगण्याचा मुद्दा असा की सोमवार ते शनिवार माझ्याही पायांना जणू चाके लावलेली असतात. आणि मग शनिवार हाफ डे झाला की मग जरा हायसे वाटते.

दर शनिवारी मी न चुकता रविवारचा प्लॅन बनवलेला असतो. पण यावेळेला प्लॅनमधून कुटूंबाला डच्चू दिला होता आणि रविवार आपण मित्रमंडळींसोबत एन्जॉय करायचा असं मनोमन ठरवलं....

विचारांची शृखंला संपते न संपते तोच तनिषा आणि प्रतिक दोघेही जणू काही प्लॅन केल्यासारखे जवळ आले आणि उद्या रविवारी बाहेर कुठेतरी फिरायला नेण्याचा आग्रह करु लागले.

मी तत्परतेने मोबाईलमध्ये उघडलेलं 'बुक माय शो' अॅप क्लोज केलं आणि मुलांशी बोलू लागलो...

"अरे पण दर रविवारी आपण जातोच ना मग या वेळेला जरा आराम करा ना घरी..."

"नको, आराम हराम है !" पोरांनी शाळेच्या भिंतीवरचं वाक्य माझ्यापुढे फेकलं.

"पण आपण जाणार तरी कुठे ? तुम्हाला सिनेमा तर आवडत नाही आणि बाहेर हॉटेलात खाणंही आवडत नाही...." मी मुद्दामच नकारार्थी सूर लावू लागलो...

"आज आम्ही म्हणू तसं तुम्ही करुन दाखवायचं !"

मुलांच्या या वाक्यावर मी गोंधळलो. रोज घरी मुलांसाठी घोडा बनतो...आणि आज घोड्यावर बसून फिरायला जाण्याचा मुलांनी हट्ट नाही केला म्हणजे मिळवली !

"अरे पण नक्की काय ते नीट सांगा" मी दबकतच विचारलं.

"पप्पा, आम्हाला आज बाहेरचं जग मनसोक्त बघायचंय.." प्रतिक मोठा झाल्याचा आव आणत म्हणाला.

"हं...!"- तनूने मान डोलावली.

"बाहेरचं जग?" मी साशंक.

"हो...आम्हाला बाहेरच्या जगातल्या काही गोष्टी प्रत्यक्षात बघायच्या आहेत."

"कोणत्या?"

"आनंद, दु:ख, दुष्टता आणि प्रेम..."- प्रतिक बहुतेक शाळेत शिकवल्याप्रमाणे मुद्दे मांडत होता.

आता मात्र मलाही चॅलेंजींग वाटलं. माझ्या प्लॅनपेक्षा आज मुलांचा काही वेगळाच प्लॅन आहे हे मी हेरले. मुलांना या शब्दांचा अर्थ प्रत्यक्ष प्रसंगांतून जाणून घ्यायचा होता हे एव्हाना माझ्या डोक्यात शिरले होते. आणि मी सुद्धा मग मुलांपुढे होकारार्थी मान डोलावली आणि मग मुलांना तयार व्हायला सांगीतले.

माझी अल्टो बाहेर काढली. दोन्ही मुले मागच्या सीटवर बसली आणि मी ड्रायव्हींग करत होतो.
मला कळत नव्हते नक्की गाडीला ब्रेक केव्हा लावायचे. मुलांनी जणू मला एक अनोखे चॅलेंज केले होते.

विचारांत गढून गेलो असताना अचानक ब्रेकवर पाय गेला आणि गाडी थांबली....
समोर रस्त्याच्या कडेला काही उघडी नागडी पोरं दिसली. साधारण सहा-सात वर्षांची असतील. दोघांच्या हातात प्लॅस्टीक पिशव्या डब्यांना बांधून कल्पकतेने तयार केलेले दोन ढोल होते. आणि बाकीची पोरं त्यावर बेधूंद नाचत होती. त्यांना कसलेच भान नव्हते. चेहऱ्यावरचं त्यांचं हास्य आणि आनंद जणू ओसंडून वाहताना दिसत होता. मी ते दृश्य मुलांना दाखवलं.

"मुलांनो तुम्हाला आनंद पाहायचा होता ना..."

माझी दोन्ही मुलं पाहतंच राहीली. आनंद कुठल्याही भौतिक सुखांत नसून तो आपल्या मनावर अवलंबून असतो हे मी मुलांना पटवून देण्यात यशस्वी झालो.

गाडी आता पुढे निघाली....साधारण एक किलोमीटर अंतर पार केलं आणि मुलांनी आवाज दिला....

"पप्पा थांबा..."

मी समोर पाहीलं. रस्त्याच्या कडेने एक माणूस खुरडत चालला होता. बिच्चाऱ्याचे दोन्ही पाय नव्हते. तो कसा चालतोय याकडे मुलं पाहू लागली...तो माणूस चालण्यासाठी जणू संघर्ष करीत होता...त्याचा चेहरा केविलवाणा दिसत होता. जणू या जगात देवाने आपल्याला त्रास आणि दु:ख भोगण्यासाठीच पाठवले आहे अशी भावना त्याच्या नजरेतून व्यक्त होत होती.

ते विदारक चित्र पाहून मुलं खट्टू झाली. पण जगात दु:ख आहे. त्याचा स्विकार केला की त्याची तीव्रता कमी होते हे मी मुलांना पटवून सांगीतलं....

मुले शांत झाली. पण जगात दु:खही असतं हे शाश्वत सत्य त्यांनी स्विकारलं होतं ही फार मोठी गोष्ट होती त्यांच्यासाठी.

आम्ही पुढे निघालो. आणि अचानक एका ठिकाणी एक महिला मोठ्याने "चोर, चोर ss पकडा पकडा sss..." अशी ओरडू लागली आणि चार-पाच तरुण त्या चोराच्या मागे पाठलाग करीत होती.

गाडी थांबवून चौकशी केल्यावर कळाले की त्या महिलेचं अंदाजे पाच तोळ्याचं मंगळसूत्र चोरट्याने खेचलं होतं आणि ते घेऊन तो पळून गेला होता. जवळजवळ दीडेक लाखांचा तो दागिना क्षणात चोरट्याने लांबविला होता. किती दुष्टपणा केला त्याने...मी मुलांना सांगू लागलो.

'दुष्टता' मुलांना सांगण्यासाठी ही घटना कामी आली होती. हा जणू योगायोगच होता. अन्यथा दुष्टतेचे अन्य एखादा भयानक प्रसंग मुलांच्या कोवळ्या मनाला सहनही झाला नसता. थोडक्यात या विषयाचा निपटारा मुलांपुढे झाला होता. तेवढ्यात त्या चारपाच तरुणांनी चोराला पकडून ते मंगळसूत्रही परत आणले होते हे नशिब !!

आता शेवटा मुद्दा बाकी राहिला होता तो म्हणजे 'प्रेम.' पण हा मुद्दा मुलांसाठीही तसा नविन नव्हता. ज्यांच्या घरात टिव्ही आहे त्या घरांतील मुलांना 'प्रेम' हा शब्द भलत्याच प्रकारे माहीत झालेला असतो. कारण कितीही बंदी केली तरी टिव्हीवरच्या मालिका आणि चित्रपट मुले पाहत असतातच. प्रेमाचे खुप बिभत्स चित्रण हल्ली त्यांत दाखविले जाते.

'प्रेम' हा शब्दच मुळी हल्ली वादग्रस्त झालाय.
आजपर्यंत प्रेमाला किळसवाण्या स्वरुपात मिडीयाने प्रस्तूत केल्यामुळेच 'प्रेम हा शब्द जणू गैरसमजाच्या खाईत लोटला गेला आहे.

मग आता मुलांना प्रेम कसे समजावून सांगायचे या विचारात मी गढलो. हल्ली बागांमध्ये प्रेमी युगूल प्रेमाचे किळसवाणे जाहीर प्रदर्शन करीत असतात. जवळच बाग होती. तिथे मुले खेळलीही असती पण प्रेमाचा चुकीचा अर्थ त्यांना मला सांगायचा नव्हता. मी गाडी वळवली...आणि मुलांसह तडक घर गाठले...

मुले थोडी शंकेच्या नजरेने माझ्याकडे पाहत होती. पण गप्प होती.

तेवढ्यात मुलांची मम्मी आली. पोरांना जवळ घेतलं...मग किचनमध्ये जाऊन तिने मुलांच्या आवडीची खीर आणली. आणि मायेनं दोघांनाही भरवली...खाल्ल्यानंतर दोघंही माझ्याजवळ आली. मी नेहमीप्रमाणे घोडा झालो. मुलं पाठीवर बसली...मी त्यांना घरभर फिरवू लागलो. मग मुलांना दोघांनाही पेंग येऊ लागला. माझ्या मांडीवर दोघेही झोपायला आली. मी त्यांना थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगू लागलो...गोष्ट सांगता सांगता मीही झोपी गेलो....



संध्याकाळी ऊठलो. तोपर्यंत मुले फ्रेश झाली होती. प्रतिक माझ्या मोबाईलवर गेम खेळत होता. मला पाहील्यावर जवळ येऊन मला मोबाईल दाखवत हसतच म्हणाला, "पप्पा, बुक माय शो !"

मी सुद्धा हसू लागलो आणि पुढच्या रविवारचा प्लॅन आम्ही आजच तयार केला !

मुलांना एव्हाना प्रेमाचा अर्थ न सांगताच कळू लागला होता....

___________〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰_____________