लेखन- श्री. प्रविण निकम
श्री. सारंगे ज्यूनीअर कॉलेजवर प्रिंसिपल या पदावर कार्यरत होते. त्यांची शिस्त आणि दरारा आख्ख्या कॉलेजमध्ये प्रसिद्ध होता. त्यांनी बोलायचं आणि इतरांनी त्यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानूनच झेलायचा..असे जणू समीकरणच बनले होते.
सारंगे सरांनी कॉलेजमधील कडक शिस्त घरीही आणली होती. त्यांच्या घरीही जणू सर्व काही शिस्तबद्ध असायचे. सारंगे सरांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला की तो जणू अंतिमच अशीच घरातील सर्वांची धारणा झाली होती. त्यांची बायकोही त्यांना 'सर' म्हणायची आणि स्वत:ची मुलेसुद्धा सरच म्हणायची..!
सरांनी स्वत:च्या घराचंही जणू शिस्तबद्ध कॉलेजच बनवून टाकलं होतं...जे कॉलेजमध्ये तेच घरी. माणसाचं वागणं सर्व ठिकाणी सारखंच असावं अशा मताचे ते होते...
आज त्यांनी घरातील सर्वांची मिटिंग बोलावली. होय..संवाद नव्हे चक्क मिटिंगच म्हणा !त्यांच्याकडे भावनांचा अभाव होता म्हणा किंवा त्यांनी स्वत:ला तसे बनवले होते म्हणा... ते घरातसुद्धा ते अगदी मशीनसारखेच वागायचे...
"या घरात मी बोलेन तेच फायनल...बाकी कुणाच्या मताला काडीचीही किंमत नाही." सरांनी हुकूम सोडला.
"अहो पण..." बायको बिच्चारी साधी होती.
"तुम्ही तर एकही शब्द बोलायचा नाही आमच्यापुढे.." घरगूती मिटिंगमध्ये जणू फतवा निघाला.
मुलं बिच्चारी अगदीच गप्प होती. त्यांची तेवढी समजही नव्हती. ती नुसतीच धाक म्हणून तिथे बसायची....तोफेच्या तोंडी फक्त त्यांच्या आईलाच जावे लागायचे. ती सुद्धा पोरांसाठी मुग गिळून गप्प राहायची....
त्यांच्या घरात जणू हुकूमशाही होती...प्रेम, आपुलकी, आपलेपणा या गोष्टी कित्येक मैल दूर होत्या...
मुलांनाही पप्पा हवे होते..पण तशी सोय नव्हती...वातावरण नव्हते. मुलांची आईसुद्धा हतबल झाली होती. काहीतरी चमत्कार होईल अन् यांचे वागणे बदलेल या एकाच आशेवर बिच्चारी तग धरुन होती...
सरांच्या अशा वागण्याचे एक कारण मात्र मुलांनी शोधून काढले होते. सरांना कॉलेजात कामाचा खुपच लोड असतो. म्हणून ते घरी अशी चिडचिड करतात हे मुलांनी पुरते ओळखलेले होते.
औपचारीक मिटिंग संपली होती. सर्वजण जेवणाच्या निमित्ताने पंक्तीला बसले होते.
सरांना दोन मुलं होती. मुलगी मानसी आणि मुलगा दिनेश...मानसी पाचवीत होती आणि दिनेश सातवीत.
आज रात्री जेवताना मुलांच्या आईने सर्वांना जेवण वाढलं होतं...प्रत्येकाच्या पुढ्यात मेथीची भाजी, चपाती, आमटी आणि भात वाढला होता. वाढल्यानंतर लगेच काहीही न बोलता खायला सुरुवात करायची ही सरांची शिस्त होती. दिनू आणि सरांनी सुरुवात केली होती पण मानसी मात्र शांत होती.
"तुझ्या घशाखाली घास जात नाहीय का? गिळवत नाहीय वाटतं.." सरांच्या मशीनमधून शब्द बाहेर पडले.
"मानसी, राणी खा गं...सर सांगताहेत ना.." आई म्हणाली.
"आई मला भूक नाहीय गं.." मानसीचे निर्वीकार उत्तर.
सरांनी मानसीकडे रागाने एक कटाक्ष टाकला.
मानसीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण नाराजी दिसत होती. पण सरांना त्याची काहीच पर्वा नव्हती. रात्री सर्वजण झोपी गेले.
सकाळ झाली. सर शाळेत जाण्यासाठी तयार होत होते. दिनेशही ऊठला होता. आईची टिफीन तयार करण्यासाठीची लगबग सुरु होती. परंतू रोज लवकर उठणारी मानसी मात्र आज उठली नव्हती. घड्याळात आठचे ठोके पडले. आई काळजीने मानसीजवळ आली आणि तिला हलवून उठवू लागली.
"राणी, अगं उठतेस ना...उशिर झालाय शाळेला जायला. उठ पटकन..."
"आई, अगं मला जावंसं वाटत नाही गं आज शाळेला.." छोटीशी मानसी म्हणाली.
मानसीचं हे वाक्य सरांच्या कानी गेलं. तणतणतच सर बेडरुममध्ये आले.
"काय झालंय तुला? काय धाड भरलीय शाळेत जायला....?"
मानसी गप्प होती.
"मी काय म्हणतोय, कान बहिरे झाले आहेत काय तुझे.....मुकाट्याने उठायचं आणि शाळेत निघायचं. मला बाकी काही माहीत नाही."
"अहो तिला नाही जायचं आज तर राहूद्या...कशाला सक्ती करायची..." मानसीची आई बोलली.
"फुकटचं मिळतय ना...म्हणून हे सूचतंय तुम्हाला...कशी नाही शाळेत जात तेच बघतो.."
सरांच्या शरीरात जणू हुकूमशहा शिरला होता. त्यांनी मांजरांना हाकलायची काठी उचलली आणि झोपलेल्या मानसीवर एकच फटका ओढला....
"उठ....उठ म्हणतोय ना....जातेस की नाही शाळेत...."
मानसीला बसलेल्या फटक्याने ती तळमळली....सहन न होण्याइतपत तो फटका तिने कसाबसा सहन केला..डोळ्यांतून पाणी घळाघळा बाहेर पडलं पण तोंडातून रडण्याचा आवाज जराही बाहेर पडला नाही...
मुलांनी आपली सहनशक्ती जणू वाढवली होती.
"या घरात मी सांगेन तस्सच झालं पाहीजे. कुणीही आपला शहाणपणा चालवायचा नाही." सरांनी हिटलरी फर्मान सोडलं.
पण मानसी काही सरांच्या फर्मानाला जूमानली नाही. ती अंथरुणावर ऊठून बसली पण शाळेत जायला काही राजी होत नव्हती.
आता मात्र सरांच्या इगोचा कडेलोट झाला. 'आपली मुलगी आपलं ऐकत नाही म्हणजे काय'...या एकाच विचाराने त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला होता.
त्यांनी मानसीचा हात धरला आणि तिला फरफटत आंघोळीसाठी बाथरुममध्ये नेऊ लागले. पोरांना याची सवय होती...पण आज सरांना मात्र थोडे विचित्र वाटले. मानसीला ओढताना त्यांचा हात गरम झाला होता. मानसीचं अंग तापाने फणफणलय याची त्यांना पुसटशी जाणीव झाली. मानसीच्या अंगात अजिबात त्राण नव्हता. ती जणू अर्धवट शुद्धीत होती. काय घडले म्हणून किचनमधून तिची धावतच आली. पाहते तर मानसीची शुद्ध हरपलेली होती.
मानसीची आई ते दृश्य पाहून ओक्साबोक्शी रडू लागली. राणी तिचा जणू जीव की प्राण होती. काय करावे हे तिला कळेना...
"अहो...का एवढे निष्ठूर होताय, उचला की राणीला, चला न्या की पटकन दवाखान्यात...!"
सरांच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही कुठेतरी माणूसकी शिल्लक होती. त्यांनी लगबगीने मानसीला दोन्ही हातांवर उचललं आणि ते बाहेर धावले. त्यांच्या हाताला चटके बसतील इतका ताप मानसीच्या अंगात होता. बाहेर आल्यावर तिची आई रिक्षाला हात करुन थाबण्यासाठी आर्जव करु लागली. अखेर एक रिक्षा थांबली आणि ते रिक्षात बसून जवळच्याच दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी तपासणी करुन लगेचच सलाईन लावली. दोन तासांच्या औषधोपचारानंतर मानसी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली.
मानसीने डोळे उघडले. समोर तिची आई उभी होती.
"आई, सर कुठे आहेत?" मानसीने प्रश्न केला.
" ते बाहेर बसलेत.."
"आई, माझं एक काम करशील?"
"बोल राणी....नक्की करेन..."
"आई तू बाहेर जा, आणि सरांना पाठवून दे आत..."
मानसीची आईला काही कळायला मार्ग नव्हता. ती थोडी गोंधळली...पण आपल्या आजारी मुलीची इच्छा म्हणून ती बाहेर आली...
"तुम्हाला राणीने आत बोलावले आहे...."
"बरं..." सर गंभीर होते. ते आत गेले. त्यांनी मानसीकडे एक हलका कटाक्ष टाकला. पण मानसी मात्र त्यांच्याकडे अगदीच रोखून बघत असलेली त्यांना दिसली.
"बोल..." सर उद्गारले.
"पप्पा...इकडे या ना..."
सरांना काही कळत नव्हतं...ते तिच्या जवळ गेले. मानसी हलकेच उठून बसली. सरांचा हात तिने आपल्या छोट्याशा हातांत घेतला आणि म्हणाली...
"पप्पा...सकाळपासून उपाशी आहात ना...तुमचे हात किती गरम लागताहेत...ताप तर नाही ना तुम्हाला...थांबा..."
असे म्हणून मानसी धडपडत उठली...रात्री तिने जेवण करावं म्हणून तिचा भाऊ दिनेशने आमिष म्हणून तिला एक कॉफी चॉकलेट दिले होते ते तस्सेच तिच्या फ्रॉकच्या खिशात होते....तिने ते चॉकलेट गुपचूप बाहेर काढले...
"पप्पा 'आ' करा ना...प्लीज.."
मानसीच्या या बोलण्याने दगडाच्या काळजाला सुद्धा पाझर फुटला. सरांनी काही कळायच्या आतच नकळत 'आ' करुन तोंड उघडले आणि मानसीने पटकन त्यांना ते चॉकलेट भरवले...
"पप्पा आता बघा तुमच्यात शक्ती येईल..." मानसीचे भाबडे बोल बाहेर पडले आणि...
सर हुंदके देऊन ढसाढसा रडू लागले....
त्यांच्याकडे आता शब्दच नव्हते. होत्या फक्त भावना....त्यांनी रडता रडता मानसीला आपल्या छातीशी धरले....तिलाही तेच हवे होते...
"मी खूप वाईट आहे गं राणी...."
आज पहिल्यांदाच ते आपल्या मुलीला राणी म्हणाले होते....
"रात्री तुला ताप आला होता म्हणून जेवली नाहीस ना...मग मी ओरडल्यावर सांगीतले का नाहीस.?"
"पप्पा तुम्ही आमच्यासाठी किती काम करता..तुम्ही दमून घरी येता...तुम्हाला आणखी त्रास नको म्हणून नाही सांगीतलं..."
"सकाळीही मी मारलं तरी तू मुकाट्यानं मार खाल्लास बेटा....तू रात्रीपासून उपाशी होतीस, तुला ताप आला होता...तरीही मी तुला मारलं...मी निष्ठूर आहे..."
"पप्पा तुमचा हात मला कधीच लागत नाही.." मानसीच्या डोळ्यांतूनही पाणी आले.
सरांच्या मनाची घालमेल झाली...त्यांनी डोळे पुसले आणि ते तडक बाहेर पडले. मानसीची आई आत आली...तिला तर काही कळायलाच मार्ग नव्हता...
तासाभरात सर परत आले...सोबत मुलगा दिनेश होता. त्याला शाळेत जाऊन त्यांनी आणले होते. त्यांनी दवाखान्यातील त्या रुमच्या दाराला आतून कडी घातली. समोर मुलगा दिनेश, मानसी आणि तिची आई होती...
सरांना गहिवरुन आले. त्या तिघांसमोर त्यांनी सपशेल हात जोडले आणि ते ढसाढसा रडू लागले.
त्यांच्या तोंडात फक्त एकच वाक्य होतं...
"मला माफ करा....मी चुकीचा वागलो...तुम्ही मला हवे आहात...!"
थोडावेळ वातावरणात गंभीरता पसरली...पण थोड्यावेळानंतर मात्र सगळं वातावरण छान, झक्कास झालं...सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी हास्य पसरलं होतं...
तेवढ्यात दारावरची बेल वाजली...
दिनेशने कडी काढली. डॉक्टर आत आले. त्यांनी मानसीला तपासले आणि डिस्चार्ज दिला. सर्वजण दवाखान्याच्या बाहेर आले.
सरांनी हातातल्या घड्याळात पाहीले. दुपारचे साडेबारा वाजले होते. सरांनी फर्मान सोडलं...
"आता आपण अजिबात घरी जायचं नाही.."
मग काय....पहिल्यांदा आईस्क्रीम..मग जेवण..नंतर सिनेमा...संध्याकाळी गार्डन...मग शॉपींग....
सर्वांनी सरांचं फर्मान अगदी आवर्जून डोक्यावर घेतलं होतं....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा