रायपूरचा राजा चंद्रदेव सध्या खुपच चिंतेत होता. त्याचे राज्य खुपच लहान. जेमतेम एक हजाराच्या आसपास सैन्य होतं त्याच्याकडे. त्यामुळेच आसपासचे बलाढ्य राजे रायपूरवर आक्रमण करण्याचा नेहमीच मनसुबा करीत.
एकदा शेजारील ब्रम्हपूरचा बलाढ्य राजा बलदेव हा रायपूरवर आक्रमण करुन ते राज्य जिंकण्याचा विचार करत आहे अशी वार्ता एक गुप्तहेर घेऊन आला. राजा चंद्रदेव काळजीत पडला. कारण राजा बलदेवकडे जवळजवळ २०००० सैन्य होतं आणि राजा चंद्रदेवकडे फक्त १०००.
चंद्रदेव राजाची चिंता वाढू लागली. राजाने अन्नपाणी सोडले. प्रजाही भयभीत झाली. सैन्यही पूरते घाबरुन गेले. संपूर्ण रायपूर नगरीवर जणू भीतीचेच साम्राज्य पसरले होते.
राजा मात्र आता दरबारातील बुद्धीवंतांचा सल्ला घेऊ लागला. दरबारात तशी खुप विद्वान मंडळी होती परंतु बलदेवाचे आक्रमण कसे परतून लावायचे यावर कुणाकडेच काही उपाय नव्हता.
शरणागती पूर्वी शेवटचा उपाय म्हणून राजाने राज्यात दवंडी पिटवली. आक्रमणाविषयी प्रजेला माहीती देण्यात आली. कुणाकडे काही जालीम उपाय असेल तर दरबारात यावे...राजा त्याला सुवर्ण मुद्रांनी मढवून टाकेल असेही सांगण्यात आले...
नेहमीप्रमाणे दरबार भरला. दरबारातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीतीचाच लवलेश होता. राजा, सेनापती अस्वस्थ दिसत होते. इतक्यातच दरबारात एका साधूने प्रवेश केला. लांब दाढी, कपाळाला टिळा लावलेल्या साधूला सेवकांनी राजापुढे हजर केले.
"महाराजांचा जयजयकार असो."
"या साधू महाराज, तुमचे दरबारात स्वागत आहे. युद्धाविषयी,आक्रमणाविषयी आपल्याला काही सांगावयाचे आहे का?"- राजाने चौकशी केली
"होय महाराज, आपण सगळे घाबरुन गेले आहात. कारण आपल्याकडे सैन्य कमी आहे म्हणून."
दरबीरातील सर्व साधूच्या बोलण्याकडे टक लावून पाहू लागले.
"महाराज, निव्वळ सैन्य कमी आहे म्हणून घाबरणे योग्य नाही. सैन्य कमी आहेच परंतु आपण आपला आत्मविश्वासही गमावला आहे.
युद्ध हे सैन्याच्या बळावर लढले जाते हे खरे आहे पण त्याही पेक्षा ते आत्मविश्वासाच्या बळावर जास्त लढले जाते."- साधू.
साधू महाराज आता पुढे काय बोलणार याबाबत राजासह सर्वांचीच ऊत्सुकता वाढली.
"महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतोय. बोलण्यास क्षमा असावी. परंतु आपण मला परवानगी दिलीत तर आपल्या फक्त एक हजार सैन्याच्या बळावरच मी हे युद्ध जिंकून दाखवेन...!!!"
साधूच्या या बोलण्यावर दरबार अवाक् होऊन स्तब्ध झाला. आता पर्यंत ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त पराभवाचेच शब्द होते...पहील्यांदाच कुणीतरी युद्ध जिंकण्याची भाषा बोलले होते. ती व्यक्ती सुद्धा कुणी युद्धातील तरबेज व्यक्ती नव्हती तर ते होते साधू महाराज...
सततच्या जप आणि ध्यानामुळे साधू महाराजांचा आत्मविश्वास खुप मोठा होता.
राजालाही आश्चर्य वाटले. एक साधू युद्ध जिंकण्याची भाषा बोलतोय आणि आपण मात्र ऊगाचच घाबरतोय हे त्याच्या लक्षात आले. आपण घाबरल्याने दरबारातील सर्वांचाच आत्मविश्वास ढळून गेलाय, सैनिकही घाबरुन गेलेत हे राजाच्या चांगलेच लक्षात आले.
कितीही कठीण परिस्थिती असली तरी घाबरुन जायचे नाही, त्या परिस्थितीचा आत्मविश्वासाने सामना करायचा हा मंत्र राजाला नव्याने मिळाला होता...
राजाचा आत्मविश्वास वाढला. दरबारातील प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढला. सैनिकही जोमाने युद्धास तत्पर झाले. प्रजाही आत्मविश्वासाने तळपली.
साधूमहाराजांनी दरबारात येऊन प्रत्येकात आत्मविश्वास फुंकण्याचे महत्त्वाचे काम केले होते. राजाने देऊ केलेल्या सुवर्ण मुद्रा न स्विकारताच साधूंनी दरबारातून प्रस्थान केले.
पुढे घनघोर लढाई झाली. राजा चंद्रदेवकडे जरी १००० सैन्य होते तरी ते शत्रूच्या २०००० पेक्षाही जास्त होते कारण त्या एक हजार सैन्याकडे जो आत्मविश्वास होता तो वीसहजार सैन्यांची तुलना करेल इतका होता.
आत्मविश्वासाच्या बळावर सैन्य तुटपुंजे असूनही राजा चंद्रदेवने युद्ध जिंकले...राज्यात सगळीकडे गोड पक्वाने वाटून आनंद साजरा करण्यात आला....एक नवा मंत्र सगळ्यांना मिळाल्याने आता कुणाच्याच चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता....
लेखन-प्रविण निकम
(जून्या ऐकीव कथेवर आधारीत)
________________________________________

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा