सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

तो आणि वृक्षारोपण !

कालचीच गोष्ट. वृक्षारोपण करायचे म्हणून दहा झाडे आणली नर्सरीतून. त्यात आंब्याची, चिंचेची, आणि नारळाची झाडे होती. आदल्या दिवशीच गावातल्या एका माणसाला हाताशी घेऊन खड्डे खणून ठेवले होते. 

कालची सकाळही अगदी धावपळीचीच. झोपेतून ऊठलो तोच स्वप्नातून खडबडून जागा होत.



त्याचं झालं असं...रात्री घरात मी एकटाच होतो. घरातले सगळे मामाकडे पाहूणे गेले होते. टिव्हीसमोर रिमोटने एकेक चॅनेल उगाचच पुढे पुढे सरकवत होतो.

...आणि माझ्या हॉलचा दरवाजा धाडधाड वाजू लागला. मी एकटाच असल्याने पुरता घाबरुन गेलो. 'कोण असेल?' याची कल्पनाही करवत नव्हती. कारण आमच्या खेडेगावात आजवर मी खुप विचित्र कथा ऐकल्या होत्या. तरीही घाबरत घाबरत मी दरवाज्यापाशी गेलो.

"कोण?" मी घाबऱ्या आवाजातच विचारले.

"आधी दार उघड मग सांगतो !"

आता तर मी पुरताच घाबरुन गेलो होतो...

मी भूतबीत मानत नाही. पण रात्री बाराच्या दरम्यान असा आवाज ऐकल्याने मी माझी सद्-विवेकबुद्धी जणू हरवून बसलो होतो.

कोंढाणा किल्ला लढवताना जसा मावळ्यांच्या 'लढा नाहीतर मरा' असा आवाज कानी पडला तस्साच आवाज माझ्याही कानात दुमदुमल्यासारखे झाले.

मी डेअरिंग करुन पुढे झालो आणि दरवाजाला हात घातला. सटकन कडी उघडली आणि तो झपकन आत आला.

उलटे पाय...दोन दात बाहेर...अगदी विचित्रच !
हा भूतांच्याच जातीतला आहे हे मी पुरते ओळखले होते.

"बाबारे काय पायजे तुला, तू इथे कशाला आलास?" मी डेअरिंग केली.

"खामोश !" त्याने आवाज टाकला....

मी अजूनच घाबरलो. पण हा काय अमरिशपूरीचा पिक्चर बिक्चर बघतो की काय अशी पुसटशी शंकाही आली.

"मी तुझ्याकडे काही मागायला आलोय..." त्याच्या पुढच्या दोन दातांच्या फटींतून शब्द बाहेर पडले.

"ए बाबा, पैसेबियसे नाहीत हं माझ्याकडे..."

"शट अप !! मला पैसे नको आहेत..."

हा भूत असला तरी सुशिक्षीत वाटत होता. तो चक्क इंग्रजी झाडत होता माझ्या अंगावर...

आता मलासुद्धा इंग्रजी झाडण्याचा मोह झाला आणि मी तशी सुरुवात करणार तोच त्याने माझ्यापुढे लोटांगण घातले आणि 'प्लीज इंग्रजीत नको' अशी मला विनंती करु लागला.

"अरे पण मग तुला हवे तरी काय?" मी मराठीत विचारले.

"दिवसेंदिवस तुम्ही भरमसाट वृक्षतोड करताय...ती थांबवा अगोदर.." त्याने माझ्याकडे हेतू स्पष्ट केला.

मी थोडा बावरलो....मला नक्की काय ते कळेना. तो पुढे म्हणाला, "अरे आंबा, चिंच, वड...ही आमची राहण्याची ठिकाणं ...आमची घरं...आणि तीच तुम्ही नष्ट करत चालला आहात...आमचे संसार उघड्यावर पडत चाललेत तुम्हा माणसांमुळे !!"

च्यामारी....हे तर आखरीतच म्हणायचे ! मी यादृष्टीने कधी विचारच केला नव्हता.

"एकवेळ आमचंही जाऊद्या..." तो पुढे सांगू लागला..
"आम्ही काय घेऊ जुळवून कसंतरी पण जंगलं नष्ट झाल्याने त्या बिच्चाऱ्या पशूपक्ष्यांचे किती हाल चाललेत कधी विचार केलाय??"

त्याने माझ्यासमोर अगदी इमोशनल प्रसंग उभा करण्याचा प्रयत्न केला.

"हे ग्लोबल वार्मिंग होतंय, पाऊस पडत नाहीय, निसर्गचक्र बिघडलंय..." एकेक करता त्याने सगळेच विषय माझ्यापुढे ठेवले आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू टपकू लागले...तोही भावनाविवश झाला होता...तो उलट्या पायांनी घराबाहेर जायला निघाला परंतू जाताना त्याने माझ्याकडून अगदी ठास्सून वचन घेतले...

वचन असे होते....."मी आजपासून झाडे तोडणार नाही...आणि खुप झाडे लावण्याचा प्रयत्न करीन."

मी त्याला मनापासून वचन दिले आणि तो घराबाहेर निघून गेला....बहुतेक प्रत्येकाच्या घरी जाऊन जनजागृती करण्याचा त्याने विडाच उचलला होता...

या स्वप्नाने माझी झोपच उडवली होती. लवकर ऊठलो. नर्सरीत जाऊन दहा झाडे आणली. खड्डे आदल्या दिवशीच मारले होते. गावातल्या माणसाला हाताशी घेऊन मी दहा झाडे लावली....

आणि हो...मी एवढ्यावरच थांबणार नाहीय. आता 'झाडे लावा, झाडे जगवा' हि माझी नित्याची जबाबदारी असणार आहे...
___________________________

लेखन:- प्रविण निकम

बुक माय शो अर्थात रविवारचे प्लॅनिंग !!



नमस्कार मंडळी....
आपण सर्वांनी 'द थलाईवा' अर्थात रजनीकांतचा रोबोट सिनेमा पाहीला असेलच. एका प्रसंगात गरज म्हणून रोबोटच्या पायाची चाके बाहेर येतात आणि तो रेल्वे ट्रॅकवरुन धूम स्टाईलने धावू लागतो...

तर सांगण्याचा मुद्दा असा की सोमवार ते शनिवार माझ्याही पायांना जणू चाके लावलेली असतात. आणि मग शनिवार हाफ डे झाला की मग जरा हायसे वाटते.

दर शनिवारी मी न चुकता रविवारचा प्लॅन बनवलेला असतो. पण यावेळेला प्लॅनमधून कुटूंबाला डच्चू दिला होता आणि रविवार आपण मित्रमंडळींसोबत एन्जॉय करायचा असं मनोमन ठरवलं....

विचारांची शृखंला संपते न संपते तोच तनिषा आणि प्रतिक दोघेही जणू काही प्लॅन केल्यासारखे जवळ आले आणि उद्या रविवारी बाहेर कुठेतरी फिरायला नेण्याचा आग्रह करु लागले.

मी तत्परतेने मोबाईलमध्ये उघडलेलं 'बुक माय शो' अॅप क्लोज केलं आणि मुलांशी बोलू लागलो...

"अरे पण दर रविवारी आपण जातोच ना मग या वेळेला जरा आराम करा ना घरी..."

"नको, आराम हराम है !" पोरांनी शाळेच्या भिंतीवरचं वाक्य माझ्यापुढे फेकलं.

"पण आपण जाणार तरी कुठे ? तुम्हाला सिनेमा तर आवडत नाही आणि बाहेर हॉटेलात खाणंही आवडत नाही...." मी मुद्दामच नकारार्थी सूर लावू लागलो...

"आज आम्ही म्हणू तसं तुम्ही करुन दाखवायचं !"

मुलांच्या या वाक्यावर मी गोंधळलो. रोज घरी मुलांसाठी घोडा बनतो...आणि आज घोड्यावर बसून फिरायला जाण्याचा मुलांनी हट्ट नाही केला म्हणजे मिळवली !

"अरे पण नक्की काय ते नीट सांगा" मी दबकतच विचारलं.

"पप्पा, आम्हाला आज बाहेरचं जग मनसोक्त बघायचंय.." प्रतिक मोठा झाल्याचा आव आणत म्हणाला.

"हं...!"- तनूने मान डोलावली.

"बाहेरचं जग?" मी साशंक.

"हो...आम्हाला बाहेरच्या जगातल्या काही गोष्टी प्रत्यक्षात बघायच्या आहेत."

"कोणत्या?"

"आनंद, दु:ख, दुष्टता आणि प्रेम..."- प्रतिक बहुतेक शाळेत शिकवल्याप्रमाणे मुद्दे मांडत होता.

आता मात्र मलाही चॅलेंजींग वाटलं. माझ्या प्लॅनपेक्षा आज मुलांचा काही वेगळाच प्लॅन आहे हे मी हेरले. मुलांना या शब्दांचा अर्थ प्रत्यक्ष प्रसंगांतून जाणून घ्यायचा होता हे एव्हाना माझ्या डोक्यात शिरले होते. आणि मी सुद्धा मग मुलांपुढे होकारार्थी मान डोलावली आणि मग मुलांना तयार व्हायला सांगीतले.

माझी अल्टो बाहेर काढली. दोन्ही मुले मागच्या सीटवर बसली आणि मी ड्रायव्हींग करत होतो.
मला कळत नव्हते नक्की गाडीला ब्रेक केव्हा लावायचे. मुलांनी जणू मला एक अनोखे चॅलेंज केले होते.

विचारांत गढून गेलो असताना अचानक ब्रेकवर पाय गेला आणि गाडी थांबली....
समोर रस्त्याच्या कडेला काही उघडी नागडी पोरं दिसली. साधारण सहा-सात वर्षांची असतील. दोघांच्या हातात प्लॅस्टीक पिशव्या डब्यांना बांधून कल्पकतेने तयार केलेले दोन ढोल होते. आणि बाकीची पोरं त्यावर बेधूंद नाचत होती. त्यांना कसलेच भान नव्हते. चेहऱ्यावरचं त्यांचं हास्य आणि आनंद जणू ओसंडून वाहताना दिसत होता. मी ते दृश्य मुलांना दाखवलं.

"मुलांनो तुम्हाला आनंद पाहायचा होता ना..."

माझी दोन्ही मुलं पाहतंच राहीली. आनंद कुठल्याही भौतिक सुखांत नसून तो आपल्या मनावर अवलंबून असतो हे मी मुलांना पटवून देण्यात यशस्वी झालो.

गाडी आता पुढे निघाली....साधारण एक किलोमीटर अंतर पार केलं आणि मुलांनी आवाज दिला....

"पप्पा थांबा..."

मी समोर पाहीलं. रस्त्याच्या कडेने एक माणूस खुरडत चालला होता. बिच्चाऱ्याचे दोन्ही पाय नव्हते. तो कसा चालतोय याकडे मुलं पाहू लागली...तो माणूस चालण्यासाठी जणू संघर्ष करीत होता...त्याचा चेहरा केविलवाणा दिसत होता. जणू या जगात देवाने आपल्याला त्रास आणि दु:ख भोगण्यासाठीच पाठवले आहे अशी भावना त्याच्या नजरेतून व्यक्त होत होती.

ते विदारक चित्र पाहून मुलं खट्टू झाली. पण जगात दु:ख आहे. त्याचा स्विकार केला की त्याची तीव्रता कमी होते हे मी मुलांना पटवून सांगीतलं....

मुले शांत झाली. पण जगात दु:खही असतं हे शाश्वत सत्य त्यांनी स्विकारलं होतं ही फार मोठी गोष्ट होती त्यांच्यासाठी.

आम्ही पुढे निघालो. आणि अचानक एका ठिकाणी एक महिला मोठ्याने "चोर, चोर ss पकडा पकडा sss..." अशी ओरडू लागली आणि चार-पाच तरुण त्या चोराच्या मागे पाठलाग करीत होती.

गाडी थांबवून चौकशी केल्यावर कळाले की त्या महिलेचं अंदाजे पाच तोळ्याचं मंगळसूत्र चोरट्याने खेचलं होतं आणि ते घेऊन तो पळून गेला होता. जवळजवळ दीडेक लाखांचा तो दागिना क्षणात चोरट्याने लांबविला होता. किती दुष्टपणा केला त्याने...मी मुलांना सांगू लागलो.

'दुष्टता' मुलांना सांगण्यासाठी ही घटना कामी आली होती. हा जणू योगायोगच होता. अन्यथा दुष्टतेचे अन्य एखादा भयानक प्रसंग मुलांच्या कोवळ्या मनाला सहनही झाला नसता. थोडक्यात या विषयाचा निपटारा मुलांपुढे झाला होता. तेवढ्यात त्या चारपाच तरुणांनी चोराला पकडून ते मंगळसूत्रही परत आणले होते हे नशिब !!

आता शेवटा मुद्दा बाकी राहिला होता तो म्हणजे 'प्रेम.' पण हा मुद्दा मुलांसाठीही तसा नविन नव्हता. ज्यांच्या घरात टिव्ही आहे त्या घरांतील मुलांना 'प्रेम' हा शब्द भलत्याच प्रकारे माहीत झालेला असतो. कारण कितीही बंदी केली तरी टिव्हीवरच्या मालिका आणि चित्रपट मुले पाहत असतातच. प्रेमाचे खुप बिभत्स चित्रण हल्ली त्यांत दाखविले जाते.

'प्रेम' हा शब्दच मुळी हल्ली वादग्रस्त झालाय.
आजपर्यंत प्रेमाला किळसवाण्या स्वरुपात मिडीयाने प्रस्तूत केल्यामुळेच 'प्रेम हा शब्द जणू गैरसमजाच्या खाईत लोटला गेला आहे.

मग आता मुलांना प्रेम कसे समजावून सांगायचे या विचारात मी गढलो. हल्ली बागांमध्ये प्रेमी युगूल प्रेमाचे किळसवाणे जाहीर प्रदर्शन करीत असतात. जवळच बाग होती. तिथे मुले खेळलीही असती पण प्रेमाचा चुकीचा अर्थ त्यांना मला सांगायचा नव्हता. मी गाडी वळवली...आणि मुलांसह तडक घर गाठले...

मुले थोडी शंकेच्या नजरेने माझ्याकडे पाहत होती. पण गप्प होती.

तेवढ्यात मुलांची मम्मी आली. पोरांना जवळ घेतलं...मग किचनमध्ये जाऊन तिने मुलांच्या आवडीची खीर आणली. आणि मायेनं दोघांनाही भरवली...खाल्ल्यानंतर दोघंही माझ्याजवळ आली. मी नेहमीप्रमाणे घोडा झालो. मुलं पाठीवर बसली...मी त्यांना घरभर फिरवू लागलो. मग मुलांना दोघांनाही पेंग येऊ लागला. माझ्या मांडीवर दोघेही झोपायला आली. मी त्यांना थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगू लागलो...गोष्ट सांगता सांगता मीही झोपी गेलो....



संध्याकाळी ऊठलो. तोपर्यंत मुले फ्रेश झाली होती. प्रतिक माझ्या मोबाईलवर गेम खेळत होता. मला पाहील्यावर जवळ येऊन मला मोबाईल दाखवत हसतच म्हणाला, "पप्पा, बुक माय शो !"

मी सुद्धा हसू लागलो आणि पुढच्या रविवारचा प्लॅन आम्ही आजच तयार केला !

मुलांना एव्हाना प्रेमाचा अर्थ न सांगताच कळू लागला होता....

___________〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰_____________

हिप हिप हुर्रे !!

सौरभ...इयत्ता ८ वी चा विद्यार्थी. तो अभ्यासात फारसा हुशार नव्हता. हे नमुद करण्याचं कारण म्हणजे तो कबड्डीचा जणू चॅम्पियन होता !

कबड्डीचा खेळ उत्तम सरावाने त्याने खुप चांगला बनवला होता. आपण आभ्यासात हुशार नाही ती कसर आपणाला इतर एखाद्या गोष्टीने भरुन काढावीच लागेल या जाणीवेतून तो कबड्डीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू बनला होता. त्याची महती तालुक्याच्या शालेय क्रिडास्पर्धांत कायमस्वरुपी पसरलेली होती.

यंदा पावसाळी क्रिडास्पर्धांच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. सौरभ त्याचीच आतुरतेने वाट पाहत होता. कारण त्याला तिथे स्वत:ची चुणूक दाखवण्याची संधी मिळत होती.


महीनाभर आधीच रोज संध्याकाळी मुलांचा कबड्डीचा सराव सुरु झाला. सौरभ कर्णधार होता. तो असला की इतर खेळाडू चार्ज केल्यासारखे मैदानावर खेळतात. तो इतरांसाठी खेळातला आधारस्तंभ व प्रेरणादायी सुद्धा होता.

यंदा पावसाचा जोर अजिबात कमी नव्हता. संततधार तर कधी जोरदार पण बारिश सुरुच...

आज संध्याकाळ झाल्यावर सौरभने शिक्षकांकडून सरावाची परवानगी घेतली. झक्कास सराव सुरु होता. सालाबाद प्रमाणे यावेळीसुद्धा आपलाच संघ फायनल मारुन पहीला येणार असा दांडगा आत्मविश्वास प्रत्येक विद्यार्थ्यात दिसून येत होता. पावसाने मैदान निसरडे झाले होते तरीही प्रॅक्टीस सुरु होती. जिंकण्यासाठी वाट्टेल ते या उक्तीप्रमाणे जीव ओतून सराव चालू असतानाच विपरीत घडले. ओल्या निसरड्या जमिनीवरुन प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात चढाई करताना नेमका सौरभचा पाय घसरला आणि तो पोटावर पडला. पोटाखाली त्याचा डावा हात आला होता. सगळेजण सौरभकडे धावले. सौरभ वेदनेने विव्हळत होता. बहुतेक त्याच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं....

शिक्षकांनी सौरभला उचलले. जवळच्याच दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी जवळच्या हॉस्पीटलमध्ये नेण्यास सांगितले. तिथे नेल्यावर एक्सरे काढले गेले. त्यात हाड तुटल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर तेथून त्याला हाडांच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे त्याच्या हाताला प्लास्टर घालण्यात आले. या सर्व धावपळीतही सौरभच्या डोक्यांत फक्त कबड्डीची स्पर्धा होती. तो नाराज दिसत होता. पण त्याचे कारण त्याला स्पर्धेत खेळता येणार नव्हते हेच होते. प्लास्टर केल्यावर दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. घरी किमान पंधरा दिवस घालवल्यानंतर सौरभ प्लास्टर असूनही आज सकाळीच शाळेत आला होता. कारण आज संघ तालुक्याला कबड्डी खेळण्यास जाणार होता.

शाळेत आल्यानंतर सर्व मुले त्याच्याभोवती गोळा झाली. त्याच्या तब्येतीची विचारपूस करु लागली. सौरभच्या डोळ्यांतून पाणी आले. ते पाहताच एक मुलगा पुढे आला.

"नको चिंता करुस, यावेळीही आपणच जिंकणार..."

मग दुसरा एकजण म्हणाला ,"सौरभ...तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आम्ही नक्कीच जीव ओतून खेळू बघच तू..."

सौरभने सर्वांना धन्यवाद दिले. त्याचबरोबर मनोमन शुभेच्छाही दिल्या. खेळणारा संघ आपल्या शिक्षकांसोबत तालुक्याला रवाना झाला. सौरभ त्या दिवशी शाळेतच थांबला..

संध्याकाळी मुले जिंकून परत शाळेत येतील तेव्हाच घरी जायचं असा सौरभने विचार केला होता. 

दुपार झाली. 'खेळात काय झाले असेल, आपला संघ कसा खेळला असेल, जिंकले असतील की....' या विचारांनी सौरभ थोडा अस्वस्थ वाटत होता. संध्याकाळचे ४ वाजले तरी मुलांचा पत्ता नव्हता. सौरभसोबत शाळेतले इतर शिक्षकही काळजी करत होते. फोन लागत नव्हते. काहीच कळायला मार्ग नसल्याने काळजीने चर्चा करीत होते.

आणि गाडीचा आवाज आला. टमटम रिक्षा शाळेच्या गेटजवळ येऊन थांबली. त्यातून एकेक खेळाडू मुलगा उतरत होता. सौरभ शाळेच्या आवारातून एकेकाचे चेहरे न्याहळत होता. सगळेजण शाळेच्या वर्गाकडे येऊ लागले. त्यांच्या हातात ट्रॉफी होती. पण सगळे शांत होते.

मुले सौरभजवळ आली. त्याच्या हातात ट्रॉफी दिली. सौरभने ट्रॉफी पाहीली. ती प्रथम क्रमांकाची होती !

"अरे व्वा !! मस्तच..." काय बोलावे ते सौरभला कळेना.

"अरे पण मग तुम्ही प्रथम क्रमांक मिळवूनही एवढे शांत का?" सौरभने न राहवून विचारले.

"होय, आम्ही प्रथम क्रमांक मिळवलाय. पण तो मिळवताना तुझी कमतरता आम्हाला पदोपदी जाणवत होती. आम्हाला खुप अटीतटीची झुंज द्यावी लागली. अखेर आम्ही १ गुणांची आघाडी घेऊनच फायनल जिंकली.."

"पण तरीही तुम्ही शांत का आहात?"

"सौरभ, तू खेळता आले नाही. तू सध्या वेदना सोसतो आहेस...तुला वाईट वाटेल म्हणून..." एका विद्यार्थ्याने खुलासा करत म्हटले.

"अरे सोडा ते सगळं....आपण जिंकलोय, पहिल्या नंबरने....! जल्लोष झालाच पाहीजे.."

सौरभचे हे शब्द ऐकताच मुलांनी मग एकच जल्लोष केला....

"हिप हिप हुर्रे...हिप हिप हुर्रे...ssS !!"

आता शाळेत एक वेगळंच विजयी आनंदाचं वातावरण पसरल होतंं ...

_________________________________________
लेखन:- श्री. प्रविण निकम

आगळी वेगळी आत्महत्या !

काल कामावरुन घरी येत होतो. सध्या कामाचा व्याप खुप असल्याने जरा ऊशीरच झाला होता. मी बाईकचे एक्सेलीटर वाढविले. आणि भर रस्त्यात मध्येच ब्रेकवर करकचून पाय द्यावा लागला....जोराने काच फुटावी तसा रस्त्यावर माझ्या पुढ्यातच आवाज झाला...

"खळ्ळळळ....!!!"

माझ्या शरीरातून जणू विज संचारुन आरपार गेल्याचा मला भास झाला.

मी मान जमिनीकडे वळवली आणि पाहतो तर काय !

...पुढ्यातच सगळ्या काचा दिसत होत्या. जणू एका बाटलीने चक्क आत्महत्येचा मार्ग स्विकारल्याचे त्यातून व्यक्त होत होते.

अचानक काय घडले म्हणून रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली. ट्रॅफिक जॅम झाली होती पण मग हळूहळू एकाबाजूने गाड्या बाहेर निघत होत्या. मी बाईकवरुन उतरलो आणि आश्चर्याने निरखून पाहू लागलो. त्या बाटलीच्या शरीराचे तुकडे सर्वत्र विखुरलेले दिसत होते. मला राहावले नाही म्हणून मी त्या तुकड्यांमध्ये शोधाशोध सुरु केली. आणि माझ्या हाती एक मोठा पुरावा सापडला.

बाटलीने असा टोकाचा निर्णय का घेतला याचे संपूर्ण आत्मकथन असलेली ती चिठ्ठी मी मनातल्या मनात वाचू लागलो....

सुखापूर गावातली ती गोष्ट. नाव सुखापूर परंतू सुखाचा पूर येईल अशी कल्पना स्वप्नातही त्या गावात केली जात नव्हती. त्याचे कारणही साजेसे होते. गाव तसा आर्थिकदृष्ट्या बेताचा. मोलमजूरीवर गुजराण करणारी जोडपी. दिवसभर परक्या गावातील सावकाराच्या शेतांमधून राबराब राबणारी. श्रीमंती त्यांच्या  गावाकडे फिरकेल अशी आशाही संपूष्टात आलेली. सर्व बायका आणि पोरे नुसती चिंताग्रस्त असायची. त्याचे कारणही योग्य होते. प्रत्येक घरातला कर्ता पुरुष दारुच्या आहारी गेलेला. प्रशासनाचे बाटली आडवी करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरलेले. कारण जास्त दराने विक्री करणारे दलाल तयार झालेले....

दिवसभर राबराब राबायचे. जो काही थोडा पैसा मिळायचा तो ही पुरुष मंडळी दारुच्या आहारी घालवायची. कष्ट करुनही त्याचे चीज होत नव्हते. बायका पोरे प्रसंगी उपाशी राहत होती.

मोठमोठ्या व्यक्ती गावात व्याख्याने देऊन गेली. समुपदेशकांनी समुपदेशन केले. पोलिसांनी कठोर भूमिका घेतली पण छे ! कुठलाच उपाय रामबाण ठरत नव्हता. आता स्त्रियांनीच बंडाचे निशाण फडकावले. जोडप्यांमध्ये रोज कडाक्याची भांडणे होऊ लागली. त्याचाच उलटा परिणाम म्हणजे पुरुष बायकांना मारहाण करु लागली...आणि मग मात्र कहर झाला. स्त्रियांनी आत्महत्येचा ईशारा दिला....दोघांच्या भांडणात मुलांची वाताहात झाली.

...या सर्व विनाशाला फक्त एकच कारण होते ती म्हणजे बाटली !!

आपल्यामुळेच कित्येकांच्या जीवनाची, संसाराची राखरांगोळी होतेय हे बाटलीला सहन झाले नाही. प्रशासन उभी असलेली बाटली आडवी करण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होते. खरे तर बाटली आडवी नव्हे तर फोडून टाकण्याचीच नितांत गरज होती. आपल्यामुळे स्रिया आत्महत्या करणार या विचाराने स्वत: बाटलीच अस्वस्थ झाली आणि मग बाटलीनेच निर्णय घेतला.....'स्वत:च आत्महत्या करण्याचा !'

चिठ्ठी वाचून झाली होती. खुप वाईट वाटले. दारुच्या आहारी आजकाल पौढांसह तरुण पिढीही जात असल्याने मलाही अस्वस्थ व्हायला झाले. भारतात नव्हे अख्ख्या जगात अशी दारुने घात केलेली कितीतरी कुटुंबे सापडतील. सुखापूरसारखी कितीतरी गावे आजही आपल्या भारतात आहेत.

विचार केला...'लोक अजूनही दारुत सुख शोधतात. दु:ख झालं की ते दारुत विरघळवण्याचा प्रयत्न करतात. कुणी अगदी टाईमपास म्हणूनही पितात तर कुणी यातले कारण नसताना निव्वळ नशेसाठीही पितात.
पितात तेही देहभान विसरुन....आणि पुन्हा कधीही भानावर येत नाहीत.


"चला, यापुढे आपल्यामुळे एखादा जरी दारुच्या जंजाळातून बाहेर पडला तरी खुप होईल असा विचार करुन मी भर रस्त्यातील अस्ताव्यस्त बाटलीच्या काचा गोळा करुन कचराकुंडीत टाकून दिल्या आणि मगच घरचा प्रवास केला...

____________________________________________

लेखन:- श्री. प्रविण निकम

नारी विरोधी कृती समिती !!!




महत्त्वाची सूचना: सदर कथा ही संपूर्णपणे विनोदी व काल्पनिक असून तिचा वास्तवतेशी काडीमात्र संबंध नाही. तसा संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा !!!
______________________________________________

हात थोडेसे थरथर करत होते. शब्द तोंडातून बोबडे निघतील की काय अशी शंका येत होती...

...आणि मी केली सुरुवात. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो...

सगळ्यांनी कान टवकारले कारण हॉलमध्ये कुणीच भगिनी नव्हत्या. माईक हाताने जाम पकडला होता. जणू काही माझा हात त्याला कुणीतरी बांधून ठेवला आहे की काय असेच मला झाले होते. कारण कधी एकदा माझे भाषण संपतेय आणि माझा माईकवरचा हात निघतोय इतकी मला घाई झाली होती. घनघोर लढाईत विना तलवार आणि विना ढाल मला लढायला उतरवले होते. साधे कबड्डी स्पर्धेपूर्वीही लोक भरपूर प्रॅक्टीस करतात पण माझे नाव मात्र अचानक पुकारले गेले...अगदी आयत्या वेळी आणि मी ज्या खुर्चीवर बसलो होतो त्या खुर्चीचे पाय हलायला सुरुवात झाली होती.

पण करणार काय...ऊठलो आणि जड पावले उचलत माईकपाशी आलो खरा...पण बोलू काय? सवयीनुसार बंधू आणि भगिनींनो बोललो आणि लगेचच कुणीतरी माझ्या तोंडाला जाडजूड कुलूप लावल्यासारखे मला झाले.

बरं विषयही साधासुधा नव्हता. 'बायकांकडून नवऱ्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक' हा भलामोठा अन् डेंजर विषय होता. विषय पाहूनच माझ्या तोंडातनं जीभ गायब झाली होती. शेवटी मी थोडी छाती पुढे काढून मनाशी ठरवलेच. विषय काही का असेना...आपण बोलायचेच ! नाही नीट जमले तरी फेकंफाक करायचीच !

असे ठरवल्यावर मग जरा हायसे वाटले. जीवात जीव आला. माझ्याच भाषेत म्हणायचे तर तोंडात जीभ आली अन् मी बोलू लागलो. भाषण ऐकायला सर्व पुरुषच होते. विषय गहन असल्यामुळे आणि पुरुषांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने तिथे बायकांना एन्ट्री नव्हती.

मग काय माझी बुलेट ट्रेन फास्ट सुटली. बायका आपल्या नवऱ्याला कशा अपमानास्पद वागवतात यावर दिले व्याख्यान ठोकून. नवरे बाहेर ऑफीसमध्ये काम करुनही बायका त्यांना घरातील कामांत जुंपतात यावरही ताशेरे ओढले. हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असाही सूचक ईशारा दिला. असेच माझ्या तोंडातून एकेक जादुई मुद्दे बाहेर निघत होते. त्या हॉलमध्ये जर बायका असत्या तर एव्हाना माझी 'कोशिंबीर' बनली असती असा चटकन विचार आला अन् मी रुमालाने माझ्या तोंडावरील घाम पुसला...

शेवटी नारीविरोधी एकदोन घोषणा देऊन मी माझ्या सैराट सुटलेल्या जीभेला लगाम घातला म्हणून बरें नाहीतर अजून काही वादग्रस्त मुद्दे बाहेर निघाले असते.

"एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो, धन्यवाद.." असे शेवटाचे वाक्य बोलून मी मग माझ्या बुलेट ट्रेनला ब्रेक लावला.

स्टेजवरुन खाली उतरलो. सर्वांनी माझ्या भाषणाची तारीफ केली. माझे भाषण उपस्थित सर्वांच्या मनाला भिडल्यागत वाटत होते. आमच्या कंपनीतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधील जवळजवळ पाचशे पुरुष अधिकारी व कर्मचारी त्या हॉलमध्ये उपस्थित होते.

भाषणाचा कार्यक्रम आटोपल्यावर प्रमुख लोकांची बैठक बसली. कंपनीतील पुरुषांचा हा विकेंडचा सामाजिक उपक्रमच होता जणू. माझ्या भाषणाचा ईफेक्ट अजूनही कायम होता. कारण मोठमोठे कंपनीतील अधिकारीही आपल्या बायकांच्या कटकटीने आणि त्रासाने वैतागले होती. शेवटी 'नारी विरोधी कृती समिती' स्थापन करण्याचे उपस्थितांत ठरले आणि मग मघासारखा मलाच पुन्हा एकदा बळीचा बकरा करण्यात आले. मी नको नको म्हणत असतानाच माझा बळी दिला गेला. समितीचा मला 'अध्यक्ष' बनवले गेले. शेवटी चहानाष्ट्याने मिटिंगची सांगता झाली.

संध्याकाळी घरी पोहोचलो. मी आज दिवसभरात काय तीर मारले होते त्याचा माझ्या  बायकोला थांगपत्ताही नव्हता.

"आज रविवार असूनही कुठे गेला होतात तुम्ही?" बायकोने विषयाला हात घातला.

"थोडं ऑफीसचं काम बाकी होतं"

"आज रविवारीसुद्धा ?"

"हो ना...द्यावा लागतो कधीकधी एक्स्ट्रा टाईम" इथेही मी फेकू लागलो.

"मला वाटले आज तुम्ही मला कुठेतरी फिरायला न्याल.." बायको सवयीनुसार बोलली.

"अगं हो ना...नेणारच होतो...पण काय करणार अचानक जावे लागले गं.."

बायकोला माझे म्हणणे नेहमीच पटते. 

"बरं सांग आज मी तुझ्यासाठी काय करु?" मी समजूत काढत म्हणालो.

"काय कराल...?" बायको लाजतच म्हणाली.

"तू जे सांगशील ते करेन." मी म्हणालो.

"इश्श !" बायकोला लाजायला जणू कारणच मिळाले. ती लाजतच पुढे म्हणाली...
"तुमचे माझ्यावर खरंच प्रेम आहे ना हो?"

"हो तर्र !"

"मग मी सांगेन ते कराल?"

"नक्कीच करेन डार्लिंग."

"प्रॉमीस?"

"हो हो प्रॉमिस.."

"मग ऐका, आठवड्याचे सहा दिवस तुमची कामाची धावपळ असते. फक्त रविवारच मिळतो मोकळा आपल्याला..."

"बरं मग?" मी शंकेने विचारले.

"मी सुद्धा खुप कंटाळून जाते हो रोज रोज ही घरची कामे करुन..."

माझी विचारचक्रे फिरायला सुरुवात झालीच होती.

"नक्की काय म्हणायचेय तुला?" मी गोंधळल्यागत विचारले.

"अहो, तुम्हाला रविवारची सुट्टी तरी असते. पण माझ्या नशिबात कधीच सुट्टी नसते बघा."

"मग त्याला मी काय करणार?"

"तुम्ही आताच तर प्रॉमिस केलंत ना की मी जे सांगेन ते कराल म्हणून?"

"पण करायचेय काय?" प्रॉमिस सहजासहजी देऊन फसलो की काय असा मला भास झाला.

"रविवारची सुट्टी आपण दोघांनीही वाटून घ्यायची. रविवार असला की सकळी सगळी कामे मी करेन आणि संध्याकाळी सगळी कामे तुम्ही करायची, म्हणजे दोघांनाही सेमटूसेम आराम मिळेल !!" बायकोने प्रॉमिसचा पुरेपुर फायदा करुन घेतला होता.

मी ज्या खुर्चीवर बसलो होतो त्या खुर्चीचे पाय सकाळसारखे पुन्हा हलू लागले. 'नारीविरोधी कृती समिती'चा अध्यक्ष होतो मी...पण बायकोवरच्या प्रेमामुळे माझ्या मनालाही पाझर फुटला होता. 'आपणही आपल्या बायकोला समजून घेतले पाहीजे' असा एक सुप्त विचार मनाला स्पर्श करुन गेला होता. 

खुर्चीचे पाय हलायचे थांबले. मी खुर्चीवरुन ऊठलो. बायकोकडे प्रेमाने पाहू लागलो. बायको लगेचच माझ्यापाशी आली अन् माझ्या हाती तिने झाडू दिला. मी सुद्धा ऑफीसवाले कपडे काढले अन् चड्डी बनियनवर घराची साफसफाई करु लागलो. प्रथम सर्व रुम झाडून काढल्या. मग किचनमध्ये गेलो. भांड्यांचा डिगारा घासला. काही कपडे धुवायचे होते. नळाखाली ते धुतले. माझी अवस्था जणू त्या पिळलेल्या कपड्यांसारखी झाली होती.

कामे झाली आता स्वयंपाकाचे मलाच पाहायचे होते. किचनमध्ये गेलो. फ्रिज उघडून बायकोने सकाळीच बाजारातून आणलेली मेथीची जुडी काढली. मिरच्या घेतल्या आणि हॉलमध्ये भाजी चिरत बसलो. 

बायको सोफ्यावर बसून 'कलर्स' वरील मालिका पाहत होती. त्या मालिकांतच असे काही बाही दाखवत असावेत अशी मला शंका आली म्हणून 'आज पासून कलर्स चॅनेल नको 'झी टिव्ही' लावत जाऊ असे बायकोला सांगणार इतक्यातच दारावरची बेल वाजली.

"टिंग टाँग.."

माझा अवतार सर्कशीतल्या विदुषकासारखा झाला होता म्हणून मी बायकोला दरवाजा उघडायला सांगीतला. तेवढ्यात टिव्हीला अॅड असल्याने बायकोने दरवाजा उघडला.

आणि समोरचे दृश्य पाहून मी हडबडलोच !
दरवाज्यात माझ्या कंपनीतले सकाळच्या भाषणाला उपस्थित असलेले जवळजवळ सातआठ पुरुष अधिकारी होते. त्यांच्या हातात फुलांचा गुच्छ होता. ते मी 'नारी विरोधी कृती समिती'चा अध्यक्ष झाल्याने माझे अभिनंदन करण्यासाठी आले होते. आणि समितीची पुढची दिशा ठरविण्यासाठी आले होते.

मला भाजी चिरताना आणि कांदे कापताना पाहून समोरच्या सगळ्यांनीच तोंडात बोटे घातली !!!

मी त्यांचे स्वागत केले. सर्वांना बसायला सांगीतले. किचनमध्ये गेलो. सर्वांसाठी थंडगार पाणी मीच आणले. ते कुणीच काही बोलत नव्हते. बहुतेक माझी दशा पाहून त्यांची तोंडे अजिबात बंदच झाली होती. मग मात्र न राहवून माझ्या बायकोने तोंड उघडले. आता ही काहीबाही बोलेल म्हणून मी पाहुण्यांना चहा करण्याचे कारण सांगून किचनमध्ये पळालो.
आणि किचनच्या दरवाज्याच्या फटीतून बायको काय शाब्दीक बाण सोडतेय ते निरखून पाहू लागलो.

"आमचे साहेब खुप चांगल्या स्वभावाचे आहेत" 

बायकोने पहिला मुद्दा मांडला. आणि उपस्थित सगळे नुसते नंदीबैलासारखे माना डोलावू लागले.

"त्यांना माझी खुप काळजी असते. आज त्यांनी घरातली सगळी कामे केली. घर झाडले, भांडी घासली, कपडे धुतले...आणि आता जेवणाला लागले होते तेवढ्यातच तुम्ही आलात"

सगळ्यांनी पुन्हा माना डोलावल्या. मी मात्र खजिल झाल्याने तोंडाला बायकांसारखा रुमाल बांधूनच चहा नेऊन द्यावा असा क्षणभर विचार आला....

"आमची सोसायटीतल्या सर्व बायकांची सकाळीच मिटिंग झाली. त्यात 'द बेस्ट कपल' म्हणून आम्हा दोघांची निवड झालीय. आणि 'द बेस्ट हजबंड' म्हणून आमत्या ह्यांची निवड झालीय. खरंच खुपच चांगले आहेत आमचे हे..."

बायकोने आणि आख्ख्या सोसायटीने माझी वाहवा केल्याने माझी छाती गर्वाने फुलली. मी तोंडाला बांधलेला रुमाल काढला आणि चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये गेलो. सर्वात पहिला चहा माझ्या बायकोला दिला. आणि मग उपस्थित सर्वांना दिला.

उपस्थित सर्वजण माझ्याकडे 'आ' वासून पाहत होते. त्यांनी मघाशी तोंडात घातलेली बोटे तश्शीच होती. 

याचा परिणाम व्हायचा तोच झाला. दुसऱ्याच दिवशी 'नारी विरोधी कृती समिती' चा गाशा गुंडाळण्यात आला. सर्वांना आपापल्या बायका आपल्याशी अशा का वागतात याचे कोडे उलगडले होते. प्रत्येकजण बायकोला वेळ देऊ लागला. बायकोची कामे शेअर करु लागला. एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेतली जाऊ लागली....

त्यातूनच पुढे 'नारी सन्मान कृती समिती' ची स्थापना झाली आणि साहजिकच पुन्हा एकदा बळीचा बकरा मलाच करण्यात आले.

....आणि मी बनलो होतो पुन्हा एकदा 'अध्यक्ष'..!

_____________________________________________